'मां-बेटा चोर है' ते कागदी विमानं भिरकावणं... संसदेचं इयत्ता पाचवी ब!
एबीपी माझा वेब टीम | 02 Jan 2019 04:48 PM (IST)
अर्थमंत्री राफेलवर बोलत असताना भाजपचे खासदार थेट गांधी घराण्यावर घसरले. त्यांनी थेट 'गांधी परिवार चोर है, माँ बेटा चोर है' अशा घोषणा दिल्या. काँग्रेस खासदारांनी कागदी विमानं उडवून संसदेची इयत्ता पाचवी ब करुन टाकली.
नवी दिल्ली : 'गांधी परिवार चोर है'ची घोषणाबाजी, संसदेत उडवलेली कागदी विमानं, अनिल अंबानी AA, तर क्वात्रोची झाला 'Q'. संसदेत खासदार फक्त गोंधळच घालायला येतात, अशी एव्हाना देशातल्या जनतेची समजूत झाली असेल. कुणीही कुणालाही नीट बोलू देत नाही. म्हणजे बालवाडीतली पोरं परवडली, पण संसदेतले खासदार बहुदा कामकाजात व्यत्यत आणण्यासाठी प्रशिक्षित केलेले असावेत. देशाचे अर्थमंत्री राफेलवर बोलत असताना कुणी तरी भाजपचे खासदार थेट गांधी घराण्यावर घसरले. त्यांनी थेट 'गांधी परिवार चोर है, माँ बेटा चोर है' अशा घोषणा दिल्या. हे सगळं होत असताना, राहुल गांधी शांत होते. पण नंतर त्यांच्या सवंगड्यांनाही संधी मिळाली. त्यांनी तर कागदी विमानं उडवून संसदेची इयत्ता पाचवी ब करुन टाकली. अखेर क्लास टीचर भडकल्या आणि त्यांनी विद्यार्थ्यांचे कान उपटले. लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी बालपणी कागदाची विमानं भिरकावली नव्हती का? असं म्हणत सर्वांना खडसावलं.