नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमध्ये सीआरपीएफच्या जवानांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याला एक वर्ष पूर्ण झालं आहे. या हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले होते. या शहिदांना आदरांजली वाहण्यासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्वीट केलं. या ट्वीटद्वारे त्यांनी भाजप सरकारला तीन प्रश्न विचारले आहेत. पुलवामा हल्ल्याचा सर्वात जास्त फायदा कुणाला झाला? असा प्रश्नही राहुल गांधींनी उपस्थित केला आहे.


राहुल गांधी यांनी आपल्या ट्वीटमध्ये लिहिलं की, "आज आपण पुलवामा हल्ल्यातील सीआरपीएफच्या 40 शहीद जवानांना आठवतो, त्यावेळी आम्ही हे विचारतो. या हल्ल्याचा सर्वाधिक फायदा कुणाला झाला? या हल्ल्याच्या तपासातून काय निष्पन्न झालं? ज्या चुकांमुळे दहशतवादी झाला, त्यासाठी भाजपा सरकारमधील कुणाला जबाबदार धरण्यात आलं?"





भाजपच्या कपिल मिश्रा यांचा पलटवर


राहुल गांधींच्या या ट्वीटवर भाजप नेते कपिल मिश्रा यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. "राहुल गांधींना लाज वाटली पाहिजे. पुलवामा हल्ल्याचा फायदा कुणाला झाला असं विचारता? इंदिरा गांधी-राजीव गांधी यांच्या हत्येचा फायदा कुणाला झाला? असं देशाने विचारलं, तर काय उत्तर देणार? एवढं घाणेरडं राजकारण करु नका. लाज ठेवा," असं ट्वीट कपिल मिश्रा यांनी केलं आहे.





गेल्यावर्षी 14 फेब्रुवारीलला पुलवामा येथे सीआरपीएफ जवानांच्या ताफ्याला निशाणा बनवण्यात आलं होतं. लष्करावर देशाच्या इतिहासातील हा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला होता. तब्बल 200 किलो स्फोटकांनी भरलेली कार दहशतवाद्यांनी जवानांच्या बसवर आदळली. त्यानंतर मोठा स्फोट झाला आणि त्यात बसचा अक्षरश: चुराडा झाला. जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती. ‘जैश’चा पुलवामा येथील दहशतवादी आदिल अहमद दार याने हा हल्ला घडवला. आदिल हा काकापोरा येथील रहिवासी होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार स्फोटकांनी भरलेल्या ज्या गाडीने जवानांच्या बसला धडक दिली, ती गाडी आदिल चालवत होता. आदिलच्या गाडीने जवानांच्या गाडीला धडक दिली.




संबधित बातम्या