पोलासांनी डाव्या पक्षांच्या कार्यकर्त्यांच्या निदर्शनावर नियंत्रण मिळवण्यासाठी लाठीमार केला आणि अश्रू धुराच्या नळकांड्या फोडल्या. शिवाय, पोलिसांनी सीपीएम आमदार सुजान चक्रवर्ती, अशोक भट्टाचार्य आणि तन्मय भट्टाचार्य यांना ताब्यात घेतले. मध्य कोलकातामध्ये सुमारे दोन हजार पोलिस तैनात ठेवण्यात आले आहेत.
टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, ममता बॅनर्जी यांची शेतकरीविरोधी धोरणं आणि राज्यातील वाढत्या बेरोजगारीविरोधात डाव्यांनी बंदचं आवाहन केले आहे.
https://twitter.com/CPIM_WESTBENGAL/status/866599750908297217
डाव्या पक्षांनी कोलकातास्थित मंत्रालय नबान्ना भवनाबाहेर चार लाख कार्यकर्त्यांना एकत्रित करण्याचं लक्ष्य ठेवलं आहे. सीपीएमच्या ट्विटर हँडलवरुन करण्यात आलेल्या ट्वीटमध्ये म्हटलंय की, कोलकाताच्या रस्त्यांवर लाखो कार्यकर्ते लोकशाही अधिकारासाठी उतरले आहेत.
सीपीएमने ‘मार्च टू नबन्ना’चं आवाहन केलं असून, डाव्यांची संघटना असलेली ऑल इंडिया किसान सभाने ममता बॅनर्जी सरकारला शेतकऱ्यांच्या वतीने मागणी पत्रही धाडलं आहे. सीपीएमच्या या निदर्शनाला इतर डाव्या पक्षांनीही पाठिंबा जाहीर केला आहे.
दरम्यान, पोलिसांनीही मोठा फौजफाटा तैनात केला आहे. कारण 27 ऑगस्ट 2015 रोजी डाव्यांनी केलेल्या निदर्शनादरम्यान मोठी हिंसा झाली होती.