नवी दिल्ली : काश्मीरप्रश्नी चर्चा करण्यासाठी पाकिस्ताननं भारताला निमंत्रण पाठवलं आहे. काश्मीर मुद्यावर तोडगा काढणं दोन्ही देशांचं कर्तव्य आहे असं पाकिस्ताननं म्हटलं आहे. भारत रॉच्या माध्यमातून दहशतवाद पसरवत असल्याचा कांगावा पाकिस्तानने केला आहे.


 
पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयानं पाकिस्तानातील भारतीय उच्चायुक्त गौतम बांबावले यांना चर्चा करण्यासाठी निमंत्रणपत्र दिलं आहे. गेल्या काही दिवसांपासूनच पाकिस्तानने काश्मीरप्रश्नी नाक खुपसायला सुरुवात केली होती. याच महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या सार्क परिषदेत गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी काश्मीरमध्ये पाकिस्तानच्या वाढत चाललेल्या हस्तक्षेपाचा मुद्दा उचलला होता.

 
पाकिस्तानच्या या कुरापतखोरीमुळे दोन्ही देशात तणाव आणखी वाढू शकतो. भारताला पाकिस्तानबरोबर फक्त पाकव्याप्त काश्मीरवर चर्चा करण्याची इच्छा आहे. जम्मू-काश्मीरवर चर्चेचा प्रश्नच येत नाही, असं यापूर्वीच राजनाथ सिंह यांनी स्पष्ट केलं आहे.