नवी दिल्ली :  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त जनतेला संबोधित केलं. पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले की, कोरोनाच्या या संकटकाळात World Culture सोबत Nature of Job देखील बदलला आहे. बदलत्या नवीन टेक्नोलॉजीचा प्रभाव त्यावरही दिसतोय. स्किलची जी ताकत आहे ती माणसाला कुठल्या कुठं पोहोचवू शकते. एक यशस्वी व्यक्तीची हीच निशाणी आहे की, तो आपल्या स्किलच्या जोरावर कुठलीही संधी दवडू देत नाही, असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे.  शिकण्याची जिद्द असेल तर जगण्याला नवी उर्जा मिळते, असा सल्ला पंतप्रधान मोदींनी यावेळी दिला.


पाच वर्षापूर्वी आजच्या दिवशी कौशल्य भारत मिशनची सुरुवात झाली होती.  कौशल्य विकास आणि उद्योग मंत्रालयाकडून या निमित्ताने एका डिजिटल संमेलनाचे आयोजन केले आहे. यावेळी पंतप्रधान मोदी बोलत होते. यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले की, आजचा दिवस 21 व्या शतकातील तरुणांना समर्पित आहे. आज कौशल्य ही तरुणांची सर्वात मोठी शक्ती आहे. बदलत्या पद्धतींनी कौशल्य बदललं आहे. आज आपले तरुण बर्‍याच नवीन गोष्टींचा अवलंब करीत आहेत, असं मोदी म्हणाले.

कोरोना संकटात आजच्या युगात कसं पुढे जायचं असा प्रश्न लोक विचारतात. कौशल्य अधिक बळकट करणे हा एकच मंत्र आहे. आता आपल्याला नेहमीच नवीन कौशल्य शिकावं लागेल. पंतप्रधान म्हणाले की प्रत्येक यशस्वी व्यक्तीने त्यांची कौशल्ये सुधारण्याची संधी मिळवली पाहिजे.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, स्किलप्रती आपल्यात आकर्षण नसेल, काही नवीन शिकण्याची आवड नसेल तर आपलं जीवनं थांबतं. एका प्रकारे तो व्यक्ती आपलं व्यक्तिमत्वाला ओझं बनवून टाकतो. तर दुसरीकडे ज्या व्यक्तिला स्किलबाबत आकर्षण आहे, त्याच्या जीवनाला ताकत मिळत राहते.  जीवनात उत्साह वाढतो. स्किल म्हणजे केवळ रोजी-रोटी आणि पैसे कमावण्याचं साधन नाही. तर जीवनात उत्साह आणण्याचं साधन आहे, असं ते म्हणाले.