पंतप्रधान मोदींनी कचरा उचलला, समुद्रकिनारी स्वच्छता करत संदेश दिला
एबीपी माझा वेब टीम | 12 Oct 2019 12:06 PM (IST)
मोदी सध्या तामिळनाडूत आहेत. आज जवळपास अर्धा तास त्यांनी या समुद्रकिनाऱ्यावर वॉक केला. समुद्रकिनाऱ्यावरील स्वच्छतेनंतर त्यांनी तिथला कचरा हॉटेलच्या एका कर्मचाऱ्याला दिला आणि सोबतच स्वच्छतेचा संदेशही दिला.
महाबलीपुरम : तामिळनाडूच्या महाबलीपुरममध्ये पंतप्रधान मोदींनी समुद्रकिनाऱ्याची साफसफाई केली. बीचवर मॉर्निंग वॉक करताना मोदींनी कचराही उचलला. याबाबतचा व्हिडीओ स्वत: मोदींनी ट्विट केला आहे. समुदकिनाऱ्यावरच्या स्वच्छतेनंतर त्यांनी हॉटेल कर्मचाऱ्यांना स्वच्छतेचा संदेशही दिला. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग दोन दिवसीय भारत दौऱ्यावर आहेत. महाबलीपुरममध्ये काल मोदींनी त्यांचं स्वागत केलं. यानिमित्तानं मोदी सध्या तामिळनाडूत आहेत. आज जवळपास अर्धा तास त्यांनी या समुद्रकिनाऱ्यावर वॉक केला. समुद्रकिनाऱ्यावरील स्वच्छतेनंतर त्यांनी तिथला कचरा हॉटेलच्या एका कर्मचाऱ्याला दिला आणि सोबतच स्वच्छतेचा संदेशही दिला. मोदींनी ट्वीट करून दिला संदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या संदर्भात एक ट्वीट केले आहे. त्यांनी या ट्वीटमध्ये म्हटले आहे की, 'आज सकाळी ममल्लापुरममधील एका बीचवर 30 मिनिटं सफाई अभियान चालवले. उचललेला कचरा हॉटेलचा कर्मचारी जेयाराजकडे सुपूर्त केला. आपण सर्वांनी फिट आणि स्वस्थ राहण्यासाठी स्वच्छता ठेवणे आवश्यक आहे'. असे म्हणत त्यांनी इतरांनाही सार्वजनिक ठिकाणी स्वच्छ ठेवण्याची काळजी घेतली पाहिजे असं मोदींनी म्हटलं आहे. तमिळनाडूतील महाबलीपूरममध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग दोन दिवसांच्या अनौपचारिक परिषदेसाठी शुक्रवारी दुपारी दाखल झाले आहेत. आज मोदी आणि जिनपिंग ताज फिशरमन्स कोव्हच्या टँगो हॉलमध्ये भेटणार असून त्यांच्यात व्यापक चर्चा होणार आहे. मात्र त्याआधी आज सकाळीच मोदी महाबलीपूरमच्या समुद्रकिनाऱ्यावर मॉर्निंग वॉकसाठी गेले होते. त्यावेळी त्यांनी समुद्रकिनाऱ्यावरील प्लास्टिकचा कचरा गोळा केला. जवळजवळ अर्धा तास मोदी अनवाणीच समुद्रकिनाऱ्यावर कचरा गोळा करत होते. त्यांनी तेथील प्लास्टिकचा कचरा गोळा केला. यामध्ये प्लास्टिकचे पाकिटं, बाटल्या, झाकणं आणि इतर गोष्टींचा समावेश होता. मोदींनी केलेल्या या साफसफाईचा तीन मिनिटांचा व्हिडीओ ट्विटवर पोस्ट करण्यात आला आहे. मोदींनी गोळा केलेला प्लास्टिकचा कचरा शेवटी ते ज्या हॉटेलमध्ये थांबले आहेत त्या हॉटेलचा कर्चमारी जयराज यांच्याकडे दिला.