नवी दिल्ली: गुजरात उच्च न्यायालयाने दिलेल्या अनेक निर्णयामुळे भारतातील न्यायव्यवस्था आणि लोकशाही मजबूत झाली, त्यामुळे न्यायव्यवस्थेनं सत्याच्या बाजूनं राहायची ताकत दिली असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलंय. ते गुजरात उच्च न्यायालयाच्या डायमंड जुबली कार्यक्रमात बोलत होते.


गुजरात उच्च न्यायालयाच्या स्थापनेला 60 वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्त झालेल्या कार्यक्रमात पंतप्रधान मोदींनी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून भाग घेतला. पंतप्रधानांनी या निमित्ताने न्यायसंस्थेचं आभार मानलं आणि अनेक शुभेच्छा दिल्या.


पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, "गेल्या काही वर्षात आपल्या विद्वत्तेने, बौद्धीकतेने आणि आपल्या निर्णयाने गुजरात उच्च न्यायालयाने देशभरात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. सत्य आणि न्यायासाठी ज्या निष्ठेने काम केलंय, आपल्या घटनात्मक कर्तव्यांप्रती जी तत्परता दाखवली, त्यामुळे देशातील न्यायव्यवस्था आणि लोकशाही दोन्ही मजबूत झाल्याचं पहायला मिळतंय."


Black Buck poaching Case: सलमानला राजस्थान हायकोर्टाचा दिलासा


पंतप्रधान म्हणाले की, "संसद, प्रशासन आणि न्यायपालिकेला वेगवेगळ्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. या जबाबदाऱ्या म्हणजे आपल्या राज्यघटनेसाठी प्राणवायू आहेत. आपल्या न्यायपालिकेने राज्यघटनेच्या या प्राणवायूची जबाबदारी पूर्ण निष्ठेने पार पाडली आहे."


पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे म्हणाले की, "न्यायपालिकेवर असलेल्या विश्वासामुळे सामान्य नागरिकांना एक प्रकारचं बळ मिळालं आहे. सत्याच्या बाजूनं उभं राहायची ताकद दिली. प्राचीन धर्मग्रंथात सांगितलं आहे की न्याय हाच सुराज्याचा पाया आहे."


भारतीय न्यायववस्थेच्या सद्य परिस्थितीवर बोलताना पंतप्रधानांनी सांगितलं की आतापर्यंत 18 हजारांपेक्षा जास्त न्यायालये संगणकाच्या माध्यमातून एकमेकांशी जोडण्यात आली आहेत. सर्वोच्च न्यायालय हे व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून जगातील सर्वात जास्त प्रकरणावर सुनावणी करणारे न्यायालय बनलं आहे. डिजिटल इंडियाच्या माध्यमातून भारतीय न्यायव्यवस्था ही आधुनिक बनत चालली आहे.


ग्रामपंचायत निवडणुकीनंतर आता सरपंच पदाचा वादही हायकोर्टात