PM Modi Mann Ki Baat : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi)  आज त्यांच्या 'मन की बात' या रेडिओ कार्यक्रमात सहभागी झाले होते. या कार्यक्रमात त्यांनी चांद्रयान-3 चंद्रावर उतरवण्यापासून ते G20 चे यश तसेच भारतीय तरुणांसाठी एक उपक्रम घेण्यात येणार असल्याची माहिती दिली. आज 'मन की बात' कार्यक्रमाचा 105 वा भाग होता. G20 च्या प्रचंड यशानंतर हा पहिला कार्यक्रम आहे. या कार्यक्रमात त्यांना देशाच्या कानाकोपऱ्यातून कशाप्रकारे संदेश मिळत आहेत, याबाबत पंतप्रधान मोदींनी सांगितले.
 


देशाच्या यशाबाबत...
पंतप्रधान मोदी म्हणाले की, 'मला पुन्हा एकदा माझ्या देशाचे आणि देशवासीयांचे यश शेअर करण्याची संधी मिळाली आहे. गेल्या काही दिवसांत, मला चांद्रयान-3 चे लँडिंग आणि दिल्लीतील G20 च्या यशाबाबत अनेक संदेश आले आहेत.' ते म्हणाले की, समाजातील प्रत्येक घटकातून मला अनेक संदेश मिळाले आहेत. चांद्रयान-३ चे लँडिंग कोट्यवधी लोकांनी पाहिले. इस्रोच्या यूट्यूब चॅनलवर ही संपूर्ण घटना 80 लाख लोकांनी पाहिली. हा स्वतःच एक विक्रम आहे.


 


'चांद्रयान-3 महाक्विझ'मध्ये सहभागी होण्याचे आवाहन


पंतप्रधान मोदींनी त्यांच्या रेडिओ कार्यक्रमात सांगितले की, चांद्रयान-3 च्या यशावरून या मोहिमेवर लोकांचे किती प्रेम आहे हे दिसून येते. या मोहिमेच्या यशानंतर देशात एक स्पर्धाही सुरू आहे, तिचे नाव आहे 'चांद्रयान-3 महाक्विझ'. या स्पर्धेत आतापर्यंत 15 लाख लोकांनी सहभाग घेतला आहे. त्यांनी लोकांना या महाक्विझमध्ये सहभागी होण्याची विनंती केली, कारण ती संपायला अजून सहा दिवस बाकी आहेत.


 



चांद्रयान-3 नंतर G20 च्या यशाने आनंद द्विगुणित


मन की बातमध्ये पीएम मोदी म्हणाले की, चांद्रयान-3 च्या यशानंतर जी-20 ला ज्या प्रकारे यश मिळाले आहे, त्यामुळे प्रत्येक भारतीयाचा आनंद द्विगुणित झाला आहे. भारत मंडपम एखाद्या सेलिब्रिटीसारखा झाला आहे. ते म्हणाले की, आफ्रिकन युनियनला G20 चा सदस्य बनवून भारताने आपली क्षमता सिद्ध केली आहे. आफ्रिकन युनियन हा 51 आफ्रिकन देशांचा समूह आहे, ज्यांना नवी दिल्ली येथे झालेल्या G20 मध्ये या गटाचे सदस्य बनवण्यात आले होते.


 


'इंडिया-मिडल ईस्ट-युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉर'बद्दल पंतप्रधान काय म्हणाले?


पंतप्रधान मोदींनी रेडिओ कार्यक्रमात सिल्क रूटवर चर्चा केली. या मार्गाने व्यापार कसा होत असे याबाबत सांगितले. G20 मध्ये 'इंडिया-मिडल ईस्ट-युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉर' सुचवण्यात आल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले. हा कॉरिडॉर पुढील शेकडो वर्षांसाठी जागतिक व्यापाराचा आधार बनेल. या कॉरिडॉरचा पाया भारतीय भूमीवर घातला गेला होता याची नोंद इतिहासात राहील 



भारतीय तरुणांसाठी 'G20 युनिव्हर्सिटी कनेक्ट प्रोग्राम' 


पंतप्रधान मोदी म्हणाले की, जी-20 कार्यक्रमाशी भारतीय तरुण कशा प्रकारे जोडले जातात यावर चर्चा करणे महत्त्वाचे आहे. वर्षभरात देशातील विविध विद्यापीठांमध्ये G20 शी संबंधित कार्यक्रम झाले. या मालिकेत आता दिल्लीत आणखी एक कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे, ज्याचे नाव आहे 'G20 University Connect Programme'. याद्वारे देशभरातील लाखो विद्यापीठातील विद्यार्थी एकमेकांशी जोडले जातील. यामध्ये आयआयटी, आयआयएम, एनआयटी आणि वैद्यकीय महाविद्यालयांसह अनेक प्रतिष्ठित संस्था सहभागी होणार आहेत. 26 सप्टेंबर रोजी हा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असल्याचे पंतप्रधान मोदींनी सांगितले. तरुणांनी हा कार्यक्रम फक्त बघू नये तर त्याच्याशी जोडले पाहिजे. या कार्यक्रमात भारतीय तरुणांच्या भविष्याबाबत अनेक रंजक गोष्टी घडणार आहेत. पंतप्रधान स्वतः या कार्यक्रमात सहभागी होणार आहे. पंतप्रधान महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसोबत होणाऱ्या संभाषणाची वाट पाहत आहे. असंही ते म्हणाले.



पर्यटन दिनी पंतप्रधान काय म्हणाले?


मन की बात कार्यक्रमात पंतप्रधान मोदी म्हणाले की, 27 सप्टेंबर हा जागतिक पर्यटन दिन आहे, काही लोक पर्यटनाला केवळ प्रेक्षणीय स्थळ म्हणून पाहतात, परंतु पर्यटनाचा एक खूप मोठा भाग रोजगाराशी संबंधित आहे. ते म्हणाले की, मी तुम्हा सर्वांना विनंती करतो की, जेव्हाही तुम्ही कुठेतरी प्रवास करण्याचा विचार कराल तेव्हा भारतातील विविधता पाहण्याचा प्रयत्न करा. G20 च्या यशानंतर भारताविषयी लोकांची उत्सुकता आणखी वाढली आहे. भारतात अनेक जागतिक वारसा स्थळे आहेत. भारतातील जागतिक वारसा स्थळांची संख्या 42 झाली आहे. असंही ते यावेळी म्हणाले.


इतर महत्त्वाच्या बातम्या


Asian Games 2023: आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचा डंका! 5 पदक पटकावले, जगभरात होतंय कौतुक