नवी दिल्ली: केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार येत्या रविवारी म्हणजेच 3 सप्टेंबरला होणार असल्याचं जवळपास निश्चित मानलं जात आहे.


नरेंद्र मोदी मंत्रिमंडळाच्या विस्तारात शिवसेनेला आणखी एक मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. तसंच केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे रेल्वेमंत्रीपद येण्याची चिन्हं आहेत.

मात्र मंत्रिमंडळ विस्तारापूर्वीच अनेक मंत्र्यांनी स्वत:हून राजीनामे सादर केले आहेत.

केंद्रीय कौशल्य विकासमंत्री राजीवप्रताप रुडी यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर, उमा भारती यांनीदेखील आरोग्याचं कारण पुढे करत आपला राजीनामा सादर केला आहे. मात्र, असं असलं तरी बाबरी मशीद प्रकरणात नाव आल्यानं उमा भारती यांना डच्चू देण्यात आल्याची चर्चा आहे.

उमा भारती यांच्यासोबतच केंद्रीय मंत्री संजीव बाल्यान, कलराज मिश्र आणि महेंद्रनाथ पांडे यांनी देखील राजीनामा सादर केला आहे. सध्या या चौघांच्या राजीनाम्यावर निर्णय घेण्यात आलेला नाही.

दुसरीकडे महेंद्रनाथ पांड्ये यांची उत्तरप्रदेशच्या भाजप प्रदेशाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

तीन मंत्रिपदं रिकामी

सध्या मोदींच्या मंत्रिमंडळातील तीन मंत्रालयाची अतिरिक्त जबाबदारी अन्य मंत्र्यांकडे देण्यात आली आहे. मनोहर पर्रिकर हे गोव्याचे मुख्यमंत्री झाल्याने त्यांनी संरक्षण मंत्रीपद सोडलं, त्याशिवाय अनिल दवे यांच्या मृत्यूमुळे पर्यावरण मंत्रालयाचा भार हर्षवर्धन यांच्याकडे आहे. तर व्यंकय्या नायडू हे उपराष्ट्रपती झाल्याने त्यांचं माहिती प्रसारण खातं रिकामं आहे.

त्यामुळे या तीन मंत्रिपदी नवे चेहरे दिसण्याची शक्यता आहे.

नितीन गडकरींना रेल्वेमंत्रीपद?

दरम्यान, रेल्वेच्या वाढत्या दुर्घटनांची नैतिक जबाबदारी स्वीकारत रेल्वेमंत्री सुरेश प्रभूंनी आपला राजीनामा सादर केला होता. पण पंतप्रधानांनी तो स्वीकारलेला नाही. मात्र रेल्वेखातं आता नितीन गडकरींना दिलं जाण्याची चर्चा आहे. तर सुरेश प्रभूंना पर्यावरण खात्याचा भार दिला जाण्याची चिन्हं आहेत.

शिवसेनेकडून कोण?

मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेला आणखी एक मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. त्यासाठी खासदार अनिल देसाई आणि खासदार आनंदराव अडसूळ यांची नावं चर्चेत आहेत. सध्या शिवसेनेचे अनंत गीते हे मोदींच्या मंत्रिमंडळात अवजड उद्योग मंत्रालय सांभाळत आहेत.