दहशतवादाला बळ देणाऱ्याच्या विरोधात एकत्र येणं गरजेचं : मोदी
एबीपी माझा वेब टीम | 04 Dec 2016 02:58 PM (IST)
अमृतसर : अमृतसरमध्ये हार्ट ऑफ एशिया परिषदेत सहभागी झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दहशतवादाच्या मुद्द्यावरुन पाकला पुन्हा एकदा खडे बोल सुनावले. दहशतवादाला बळ देणाऱ्याच्या विरोधात सर्वांनी एकत्र येणं गरजेचं असल्याचं मोदी म्हणाले. पंतप्रधान मोदी यांच्यासह अफगानिस्तानचे राष्ट्रपती अश्रफ गनी आणि पाकिस्तानच्या पंतप्रधानांचे सल्लागार सरताज अजीज देखील या परिषदेला उपस्थित होते. अफगाणिस्तानमध्ये सुरक्षा वाढवणं हे आपलं ध्येय आहे. अफगाणिस्तानसमोर अनेक आव्हानं आहेत. मात्र एकत्रित येऊन या आव्हानांचा एकत्रितपणे सामना करत इतर देशांसोबतही संबंध मजबूत करणं गरजेचं आहे, असं मोदी म्हणाले. भारत नेहमी अफगाणिस्तानसोबत राहिल. अफगाणिस्तानमध्ये शांतता आणि विकासासाठी आंतरराष्ट्रीय समुहाचं योगदान गरजेचं असल्याचं मोदींनी सांगितलं. तसंच भारत अफगाणिस्तानच्या विकासासाठी सोबत असल्याचं आश्वासनही दिलं. दरम्यान, काल संध्याकाळी सरताज अजीज आणि पंतप्रधान मोदी यांच्याशी हातमिळवणी केली, मात्र त्यांच्यात काही बोलणं झालं नाही. त्यामुळे भारत-पाक चर्चा पुन्हा सुरु होण्याची शक्यता धूसर मानली जात आहे. 40 देशांचा सहभाग असलेल्या या संमेलनात भारत दहशतावदाचा मुद्दा केंद्रस्थानी ठेवून पाकिस्तानला घेरण्याच्या तयारीत असणार आहे. संमेलनाच्या शेवटी दहशतवादाच्या मुद्द्यावर भारताकडून जास्त जोर लावला जाणार असल्याची माहिती आहे.