PM Modi Speech: देशभरात आज 77 वा स्वातंत्र्यदिन साजरा होत आहे. दिल्लीतील लाल किल्ल्यावर पंतप्रधान मोदींच्या (PM Modi) हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं लाल किल्यावर ध्वजारोहण पार पडल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी देशाला संबोधित केलं. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. तसंच देशातील युवकांना संदेशही दिला. लोकशाहीत परिवारवादी पक्ष ही विकृती आहे. परिवारवादामुळे विकासाला ब्रेक लागला, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. 

परिवारवादामुळे विकासाला ब्रेक 

भ्रष्टाचाराच्या विरोधात अखंड लढणार आहे.  देशातून परिवारवाद उखडून लावणार आहे. लोकशाहीत परिवारवादी पक्ष ही विकृती आहे. परिवारवादामुळे विकासाला ब्रेक लागला आहे. लांगुलचालनाच्या विरोधात लढा राहणार आहे.

विश्वकर्मा योजनेसाठी 13  हजार कोटी

पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून विश्वकर्मा योजनेची घोषणा करण्यात आली आहे. विश्वकर्मा योजनेसाठी 13 हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे.   

पुढील एक हजार वर्षांवर भाष्य

देशाचं गतवैभव परत मिळवून आपल्याला उभं राहायचं आहे. आपण जो निर्णय घेऊ, जे पाऊल उचलू त्याचा परिणाम पुढच्या एक हजार वर्षांपर्यंत आपली दिशा निर्धारित करणार आहे.

मणिपूरमधील समस्येवर शांततेतून तोडगा काढणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मणिपूरच्या घटनेचाही भाषणात उल्लेख केला. आई-बहिणींच्या सन्मानाला धक्का लावण्यात आला. मात्र आता तेथे शांतता प्रस्थापित होत आहे. देश मणिपूरमधील नागरिकांबरोबर आहे.

मोदींचा युवकांना संदेश

आज छोट्या छोट्या गावातली मुलं, मुली खेळाडू म्हणून पुढे येत आहेत. सॅटेलाइट तयार करुन विद्यार्थी तो आकाशात सोडण्यासाठी सज्ज आहे. आपल्या देशात संधींची कमी नाही. तुम्ही जितक्या संधी मागाल त्यापेक्षा जास्त संधी देण्याची क्षमता आपल्या देशात आहे, असा संदेश मोदींनी तरुणांना दिला आहे

जनता जनादर्नाची साथ लाभली त्यामुळे ट्रान्सफॉर्म 

2014 मध्ये आणि 2019 मध्ये जनतेने सरकार फॉर्म केलं त्यामुळे माझ्यात रिफॉर्म करण्याची हिंमत आली. त्यानंतर ब्युरोक्रसीने परफॉर्म केलं. जनता जनादर्नाची साथ लाभली त्यामुळे ट्रान्सफॉर्म होतानाही दिसत आहे.

कोरोना काळात जगाने देशाची ताकद पाहिली

मोदींकडून लाल किल्ल्यावरील भाषणात कोरोना काळातील कामाचा उल्लेख केला आहे. कोरोना काळात जगाने भारताची ताकद पाहिली. कोरोनानंतर जागतिक समीकरणं बदलली. आता भारताची संधी, त्यामुळे ही संधी सोडायची नाही, असे आवाहन मोदींने केले आहे

 केंद्र सरकारकडून राज्य सरकारांना 100 लाख कोटी

2014 पूर्वी देशभरातील राज्यांना केंद्र सरकारकडून  30 लाख कोटी रूपय दिले जायचे, मात्र आता 100 लाख कोटी रूपये दिले जातात.  लाल किल्ल्यावरून 10 वर्षातील हिशोब देतोय, असे मोदी म्हणाले.

भारतात सर्वाधिक युवक

डेमोग्राफी, डेमोक्रेसी आणि डायव्हर्सिटी भारताची ताकद आहे. 30 वर्षाखालील युवकांची सर्वाधिक संख्या फक्त भारताकडे आहे. 

साडेतेरा कोटी भारतीयांची गरीबी हटवली

पाच वर्षात साडे तेरा कोटी भारतीयांची गरीबी हटवली आहे. तर पीएम किसान योजनेचा शेतकऱ्यांना फायदा झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून लोक उपयोगी योजनांवर भाष्य करण्यात आले.

हे ही वाचा :