PM Modi अयोध्येत राम मंदिरात प्रभू श्रीरामाची  प्राणप्रतिष्ठापना केल्यानंतर दिल्लीत परताच पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी मोठी घोषणा केली आहे. पंतप्रधान मोदी यांनी पंतप्रधान सूर्योदय योजनेची घोषणा केली आहे. देशातील नागरिकांच्या घरावर त्यांच्या मालकीचे सोलर सिस्टीम असावी यासाठी ही योजना सुरू करण्यात येणार असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले. पीएम मोदी यांनी आपल्या सोशल मीडिया हॅण्डलवर या योजनेची माहिती दिली आहे. 

पंतप्रधान मोदी यांनी काय म्हटले?

पंतप्रधान मोदी यांनी म्हटले की, अयोध्येत रामलला प्राणप्रतिष्ठापना केल्यानंतर माझा संकल्प आणखी दृढ झाला आहे. देशातील नागरिकांच्या घरावर त्यांची स्वत:ची सोलर यंत्रणा असावी. 

पंतप्रधान मोदी यांनी पुढे म्हटले की, अयोध्येहून परतल्यानंतर, मी पहिला निर्णय घेतला आहे की आमचे सरकार 1 कोटी घरांवर छतावर सौरऊर्जा बसविण्याचे लक्ष्य घेऊन "प्रधानमंत्री सूर्योदय योजना" सुरू करणार आहे. यामुळे गरीब आणि मध्यमवर्गीयांचे वीज बिल तर कमी होईलच, पण ऊर्जा क्षेत्रात भारत स्वावलंबी होईल,असा विश्वास पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केला.