पाटणा : बिहारमध्ये महापुरामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. तिथल्या अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बिहारचे मुख्यमंत्री नितिश कुमार यांनी एकत्रित बिहारमधील पुराची पाहणी केली.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महापुराचा तडाखा बसलेल्या बिहारला 500 कोटी रूपयांची मदत जाहीर केली आहे. पूरपरिस्थीतीच्या पाहणीनंतर मोदींनी या मदतीची घोषणा केली.

बिहारमध्ये या पुरामळे आतापर्यंत 418 जणांचा जीव गेला आहे. 19 जिल्ह्यातील 61 लाख 67 हजार लोकसंख्येला या पुराचा फटका बसला आहे. राज्य सरकारकडून पुरग्रस्तांना धोक्याच्या ठिकाणाहून बाहेर काढणं आणि जीवनावश्यक वस्तू पोहोचवण्याचं काम युद्ध पातळीवर चालू आहे.

एनडीआरएफच्या 28 टीमचे 1152 जवान आणि 118 नौका, एसडीआरफच्या 16 टीमचे 446 जवान आणि 92 नौका, तर सेनेच्या 7 तुकड्यांचे 630 जवान आणि 70 नौका बचावकार्यसाठी प्रयत्न करत आहेत.

आतापर्यंत 7 लाख 81 हजार 657 लोकांना पूरस्थितीतून सुरक्षिती ठिकाणी हलवण्यात आलं आहे. तर 624 ठिकाणी 1 लाख 56 हजार 560 जणांना निवारा देण्यात आला आहे. 1565 सामूहिक स्वयंपाकघरं सुरु करण्यात आले आहेत, ज्याद्वारे 3 लाख 44 हजार 137 नागरिकांना अन्न पुरवण्यात येत आहे.