मुंबई : पेटा म्हणजेच पीपल फॉर इथिकल ट्रीटमेंट ऑफ एनिमल्स या संस्थेने भारतातल्या सर्वात मोठ्या सहकारी तत्त्वावरील दूध उत्पादक कंपनीला एक अजब सल्ला दिला आहे. अमूल या कंपनीने आता गाईच्या दुधाच्या ऐवजी वॅगन मिल्क म्हणजेच शाकाहारी दूध उत्पादनाकडे वळावे त्यातच भविष्य आहे असे पेटा ने एका पत्राद्वारे अमूल कंपनीला कळवले आहे. यामुळे नवीन वादाला तोंड फुटले आहे. 


अमूल कंपनीच्या सीईओ आर. एस. सोडी यांनी मात्र पेटा ने दिलेल्या या सल्ल्याचा विरोध केलाय. सोधी यांनी जागरण मंचचे राष्ट्रीय सहसंयोजक अश्विनी महाजन यांनी केलेल्या ट्विटला रिट्विट करत आपला पाठिंबा दिला आहे. 


सोडी म्हणतात, 'जर अमूल कंपनीने गाईच्या दुधाचे उत्पादन थांबवलं तर भारतातल्या 10 कोटी शेतकऱ्यांना रोजगार कोण देणार? आपल्याला माहिती नाही का बहुतेक दूधउत्पादक शेतकरी भूमिहीन असतात. आपल्या सल्यामुळे त्यांचे उपजीविकेचे एकमेव साधन नष्ट होईल. आपल्या परंपरेतच दुधाचा वापर आहे. त्यामुळे शाकाहारी दुधाच्या मागे लागणे योग्य नाही'.


अमूल कंपनीच्या प्रतिक्रियेवर देखील पेटा इंडियाकडे उत्तर आहे. 'शाकाहारी दुधाकडे मिळाल्यास शेतकऱ्यांचे रोजगार जाणार नाहीत उलट यामुळे प्राण्यांवर होणारे अत्याचार थांबतील आणि दुधापासून आपल्या शरीरावर होणारे दुष्परिणाम देखील होणार नाहीत. भारतात गायींना दूध देण्यासाठी त्रास दिला जातो, त्यांना दुभते ठेवले जाते, जेव्हा त्यांचे शरीर दूध देणे बंद करते तेव्हा त्यांना कत्तलखान्यात विकले जाते आणि मांस मिळवले जाते', असे पेटा इंडियाचे म्हणणे आहे.


Covid-19 : कोरोनापासून बचाव अन् रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आयुष मंत्रालयनं सांगितले उपाय


महाराष्ट्र दूध उत्पादनात देशातील एक अग्रेसर राज्य मानले जाते. 2020 च्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात दिवसाला एक कोटी 40 लाख लीटर इतक्या दुधाचे उत्पादन होते. राष्ट्रीय डेअरी विकास बोर्डाच्या दोन हजार अठरा एकोणीस च्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात 11 हजार 655 टन इतके वार्षिक दूध उत्पादन केले जाते. त्यामुळे दूध उत्पादनावर अवलंबून असणारे शेतकरी देखील लाखोंच्या संख्येने महाराष्ट्रात आहेत. त्यांना मात्र हा सल्ला मुळीच पटलेला नाही. 


पेटा इंडिया ने सांगितलेले शाकाहारी दूध म्हणजे नेमके काय ? 


शाकाहारी दुधाचे अनेक प्रकार सध्या जगात उपलब्ध आहेत. शाकाहारी दूध हे नारळ काजू बदाम आणि मुख्यतः सोया पासून बनवली जाते. सध्या बाजारात अनेक नागरिक या दुधाला पसंती देत आहेत. गाईच्या दुधापेक्षा शाकाहारी दूध हे जास्त फायदेशीर असते असा दावा देखील पेटा इंडिया ने केला आहे. 


पेटा इंडिया ने दिलेला सल्ला अमूल इंडिया कंपनीने धुडकावून लावला असला तरी, यावर चर्चा ही होणारच. गाईला देवी म्हणून पूजा करणाऱ्या भारतात तिच्यापासून मिळालेले दूध प्रसाद म्हणून पिण्याची परंपरा आहे. मग असा भारत बदलेल का? 


श्रीकृष्ण हा देखील गवळी होता. त्यामुळे गाय आणि तिच्यापासून मिळणारे दूध याचा संबंध हा थेट अध्यात्माशी जोडला गेला आहे. इतकेच नाही तर भारतीय शेतकरी आर्थिक दृष्ट्या देखील गाईंवर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे. म्हणूनच गाईला कामधेनू म्हटले जाते, मग अशा या भारतात पेटा इंडियाने सांगितल्याप्रमाणे खरंच बदल होऊ शकेल का हा सर्वात मोठा प्रश्न निर्माण होतो.