Parliament Session : सोमवारपासून सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनावर चर्चा करण्यासाठी सरकारने बोलवलेल्या सर्वपक्षीय बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहिले नाहीत. परंतु, पंतप्रधानांच्या गैरहजेरीवरून कांग्रेसने प्रश्न उपस्थि केले आहेत. पंतप्रधान मोदी सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित नाहीत हे असंसदीय नाही का? असा प्रश्न काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी उपस्थित केला आहे. 


रविवारी राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय बैठक झाली. या बैठकीला भाजपच्या अनेक नेत्यांसह काँग्रेसचे नेते उपस्थित होते. दिल्लीतील संसद भवनाच्या जुन्या इमारतीत ही बैठक पार पडली. परंतु, या बैठकीला पंतप्रधानच उपस्थित नव्हते. हाच मुद्दा पकडत काँग्रेसने हल्लाबोल केला आहे.  


 सर्वपक्षीय बैठकीला पंतप्रधानच उपस्थित नाही हे असंसदीय नाही का? असा सवाल करत जयराम रमेश यांनी ट्विट केले आहे. जयराम रमेश यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, 'संसदेच्या आगामी अधिवेशनावर चर्चा करण्यासाठी सर्वपक्षीय बैठक नुकतीच झाली. परंतु, पंतप्रधान नेहमीप्रमाणे गैरहजर आहेत, हे 'असंसदीय' नाही का?






संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी, केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे, अधीर रंजन चौधरी, जयराम रमेश, द्रमुक नेते टीआर बालू, टीएमसी नेते सुदीप बंदोपाध्याय, शिवसेना नेते संजय राऊत, राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल या बैठकीला उपस्थित होते. यासोबतच टीडीपी, सपा, बसपा, सीपीएम, आरएसपी, आरजेडीचे नेतेही या बैठकीत उपस्थित आहेत. 


 


पावसाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी संसदेच्या सदस्यांना आधीच सांगितले आहे की, पावसाळी अधिवेशनात 18 बैठका होतील आणि संपूर्ण अधिवेशन 108 तासांचे असेल. सभागृहाची शालीनता, प्रतिष्ठा आणि शिस्त राखण्यासाठी सदस्यांनी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.


दरम्यान, या पावसाळी अधिवेशनात बेरोजगारी, अग्निपथ योजना आणि शेतकऱ्यांशी संबंधित मुद्द्यांवर चर्चा व्हावी, असे विरोधी पक्षांनी आधीच सांगितले आहे.