कुशीनगर: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज उत्तर प्रदेशामधील कुशीनगरमध्ये आयोजित परिवर्तन सभेत विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला. 'आम्ही भ्रष्टाचार आणि काळा पैशाचा मार्ग बंद करु पाहात आहोत. मात्र विरोधक भारत बंद करायला निघाले,' असं म्हणत मोदींनी काँग्रेस, तृणमूल काँग्रेस आणि जेडीयूवर टीकास्त्र सोडलं.


पंतप्रधानांनी नोटाबंदीचा निर्णय हा गरीबांचे जीवनमान उंचावण्यासाठी घेतला असल्याचे सांगून विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला. पंतप्रधान म्हणाले की, ''विरोधकांनी उद्या भारत बंदचे आवाहन केले आहे. पण वास्तवात भ्रष्टाचाराचा मार्ग बंद झाला पाहिजे की, भारत बंद झाला पाहिजे?'' असा प्रश्न यावेळी उपस्थितांना विचारला. मोदींच्या या प्रश्नावर जनतेनेही हात उंचावून भ्रष्टाचार आणि काळा पैशांवर लगाम घातली पाहिजे असे सांगितले.

नोटाबंदीच्या निर्णयामुळे जनतेला होणाऱ्या त्रासाबद्दल पंतप्रधान म्हणाले की, ''मी तुमच्याकडे 50 दिवसांची मागणी केली आहे. आता तर वीसच दिवस पूर्ण झाले आहेत. अजून 30 दिवस थोडा त्रास सहन करावा लागेल. पण मी पहिल्याच दिवशी सांगितले होते की, हा निर्णय सहज सोपा नव्हता.'' या निर्णयामुळे मोठ्या लोकांना मोठा त्रास होतोय, तर गरिबांना कमी त्रास होतो आहे, असेही त्यांनी यावेळी नमुद केले.

नोटाबंदीच्या निर्णयावरुन होणाऱ्या त्रासावर बोलताना पंतप्रधानांनी वृत्तपत्रांमध्ये छापलेल्या सरकारी जाहिरातींचा आधार घेत, ''तुमचा मोबाईलच तुमच्यासाठी बँक असेल,'' असे सांगितले.

या सभेची सुरुवात पंतप्रधानांनी भोजपुरी भाषेतून केली. त्यांनी आपले सरकार शेतकऱ्यांसाठी कटबद्ध असल्याचे पुन्हा एकदा सांगितानाच ऊस उत्पादक शेतकऱ्यांसह इतर शेतकऱ्यांसाठी घेतलेल्या अनेक निर्णयांची माहिती दिली.