Pahalgam Terror Attack : जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terror Attack) भारत आणि पाकिस्तानमध्ये (India and Pakistan) युद्धजन्य स्थिती निर्माण झाली आहे. पाकिस्तानस्थित लष्कर-ए-तैयबाची (for Pakistan-based Lashkar-e-Taiba) शाखा मानली जाणाऱ्या द रेझिस्टन्स फ्रंट (टीआरएफ) The Resistance Front (TRF) या गटाने पहलगाम हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. त्यामुळे भारत यावेळी पाकिस्तानला कायमचा धडा शिकवण्याच्या तयारीत आहे. सीमेवर सुद्धा तणाव मोठ्या प्रमाणात वाढला असून शस्त्रसंधीचे उल्लंघन पाकिस्तानकडून करण्यात येत आहे. पाकिस्तानची चिथावणीखोर वक्तवे सुद्धा आगीत आणखी भर टाकत आहेत. या हल्ल्यामुळे दोन्ही अण्वस्त्रधारी शेजाऱ्यांमधील तणाव आणखी वाढला आहे. या सर्व वादात आता मध्यस्थी करण्याची तयारी इराणने दाखवली आहे.
शुक्रवारी, इराणचे परराष्ट्र मंत्री सय्यद अब्बास अराघची (Iranian Foreign Minister Seyed Abbas Araghchi) यांनी एक्स (पूर्वी ट्विटर) वर पोस्ट केली आणि तेहरानकडून मदत करण्याची तयारी दर्शवली. “भारत आणि पाकिस्तान हे इराणचे बंधू शेजारी आहेत, ज्यांचे संबंध शतकानुशतके जुन्या सांस्कृतिक आणि सभ्यतेच्या संबंधांवर आधारित आहेत. इतर शेजाऱ्यांप्रमाणे, आम्ही त्यांना आमचे सर्वोच्च प्राधान्य मानतो,” असे अराघची यांनी लिहिले. त्यांनी पुढे म्हटले की इराण “या कठीण काळात अधिक समजूतदारपणा निर्माण करण्यासाठी इस्लामाबाद आणि नवी दिल्लीतील त्यांच्या चांगल्या कार्यालयांचा वापर करण्यास तयार आहे.”
पर्शियन कवी सादी यांचा हवाला देत ते पुढे म्हणाले,
“मानव हे संपूर्ण घटक आहेतएक सार आणि आत्म्याच्या निर्मितीमध्येजर एका सदस्याला वेदना झाल्या तरइतर सदस्य अस्वस्थ राहतील.”
इराणने यापूर्वी या हल्ल्याचा तीव्र निषेध केला होता, तसेच हा गंभीर गुन्हा असल्याचे म्हटले होते आणि दहशतवादाविरुद्ध समन्वित आंतरराष्ट्रीय प्रयत्नांचे आवाहन केले होते. इराणने भारताप्रती शोक व्यक्त केला आणि गुन्हेगारांना तसेच त्यांच्या म्होरक्यांना न्यायाच्या चौकटीत आणण्याचे महत्त्व अधोरेखित केले.
भारताकडून दंडात्मक कारवाईचा दणका
दरम्यान, पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानवर जोरदार प्रत्युत्तरात्मक कारवाईची घोषणा केली. यामध्ये सिंधू पाणी करार निलंबित करणे, अटारी मार्गावरून सीमापार व्यापार थांबवणे, राजनैतिक संबंध कमी करणे आणि सार्कतंर्गत येणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांसाठी व्हिसा निलंबित करणे यांचा समावेश होता. दुसरीकडे, पहलगाम घटनेत सहभाग नाकारत पाकिस्तानने सुद्धा भारतावर सुद्धा निर्बंध लादले. वाघा सीमा क्रॉसिंग बंद केले, भारतीय नागरिकांसाठी सर्व सार्क व्हिसा निलंबित केले, व्यापार अप्रत्यक्ष मार्गांसह थांबवला आणि भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद केले. पाकिस्तानने 1972 मध्ये स्वाक्षरी केलेला एक महत्त्वाचा द्विपक्षीय करार, सिमला करार रद्द करण्याची घोषणा देखील केली. पाकिस्तान सरकारने इशारा दिला की सिंधू पाणी कराराअंतर्गत पाणी वळवण्याचा भारताचा कोणताही प्रयत्न "युद्धाचा निर्णय" मानला जाईल.
सौदी अरेबिया आणि संयुक्त राष्ट्रांनी संयमाचे आवाहन केले
दोन्ही देशात वाढलेल्या तणावामुळे इतर राष्ट्रांनी सुद्धा राजनैतिक चिंता व्यक्त केली आहे. इराणने ऑफर दिल्याच्या त्याच दिवशी, सौदी अरेबियाचे परराष्ट्र मंत्री प्रिन्स फैसल बिन फरहान अल सौद यांनी भारतीय परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री मोहम्मद इशाक दार यांच्याशी स्वतंत्रपणे फोनवर चर्चा केली. परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी ट्विट करून माहिती दिली. दरम्यान, पाकिस्तानच्या परराष्ट्र कार्यालयाने पुष्टी केली की दार यांनी सौदी मंत्र्यांना राष्ट्रीय सुरक्षा समितीच्या निर्णयांची माहिती दिली आणि भारताच्या एकतर्फी निर्णयांवर टीका केली.संयुक्त राष्ट्रही घडामोडींवर लक्ष ठेवून आहे. महासचिव अँटोनियो गुटेरेस म्हणाले की त्यांचे कार्यालय परिस्थितीवर खूप बारकाईने आणि अत्यंत चिंतेने या सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. त्यांनी दोन्ही देशांना जास्तीत जास्त संयम बाळगण्याचे आणि परिस्थिती आणखी बिघडू नये असे आवाहन केले.
जयपुरात दोन शक्तीशाली विमाने उतरली
दरम्यान, भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धजन्य स्थिती असतानाच जयपूरमध्ये उतरलेल्या दोन शक्तीशाली विमानांची चर्चा रंगली आहे. अमेरिका आणि इस्त्रायलची दोन विमाने जयपुरात उतरल्याने सुद्धा भूवया उंचावल्या आहेत. लष्करी कारवाईचा भाग म्हणूनही या घडामोडींकडे पाहिलं जात आहे. सोशल मीडियात विमाने उतरल्याचे फोटो व्हायरल झाले आहेत. अर्थात ही विमाने कोणत्या कारणांसाठी उतरली होती, याची अधिकृत माहिती मिळू शकलेली नाही.
इतर महत्वाच्या बातम्या