मुंबई : इंडियन ऑईलसह सर्वतेल कंपन्यांनी एअर इंडियाचा इंधन पुरवठा बंद केला आहे. थकित कर्ज न फेडल्याने सहा विमानतळावंर एअर इंडियाच्या विमानांना इंधन मिळत नाही. एअर इंडियाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने या वृत्ताला दुजोरा दिला आहे. मात्र एअरलाईन्सची विमानांचं उड्डाण सामान्य असून अद्याप या निर्णयाचा कोणताही परिणाम झालेला नाही, असंही त्यांनी सांगितलं.


सरकारी तेल कंपन्यांनी गुरुवारी (22 ऑगस्ट) दुपारी चारच्या सुमारास पुणे, कोची, विशाखापट्टणम, मोहाली, रांची आणि पाटणा विमानतळांवर इंधनाचा पुरवठा रोखला आहे. "आम्ही संपर्कात असून लवकरच यावर तोडगा निघेल," असं इंडियन ऑईलतर्फे सांगण्यात आलं आहे.

"आर्थिक सहकार्याशिवाय एअर इंडिया आपलं एवढं मोठं कर्ज फेडू शकत नाही. मात्र या आर्थिक वर्षात आमची आर्थिक कामगिरी चांगली असून आम्ही फायद्याच्या दिशेने वाटचाल करत आहोत. देणेकरी असूनही एअरलाईन्स चांगली कामगिरी करत आहे," असं एअर इंडियाच्या प्रवक्त्याने सांगितलं.

आर्थिक संकटात अडकलेल्या एअर इंडियावर 54 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त कर्ज आहे. यापैकी 3 हजार 500 कोटी रुपयांचं कर्ज हे तेल कंपन्यांचं आहे.

एअर इंडियाने 60 कोटी रुपये दिले
दरम्यान, एअर इंडियाने 60 कोटी रुपयांच्या रकमेची फेड केली आहे. ही मागील थकित रक्कम होती. उड्डाणांवर कोणताही परिणाम होऊ नये यासाठी सध्या सगळ्या विमानांमध्ये इंधन भरलेलं आहे.

याआधीही इंधन पुरवठा रोखला होता
याआधी दोन वेळा तेल कंपन्यांनी एअर इंडियाचा इंधन पुरवठा रोखला होता. 16 जुलै रोजी इंडियन ऑईल कॉर्पोरेशनने थकित रक्कम न दिल्याने पाटणा, पुणे, चंडीगड, कोची, विशाखापट्टणम आणि रांची यांसारख्या विमानतळांवर इंधनाचा पुरवठा बंद केला होता. परंतु नागरी उड्डाण मंत्रालयाच्या हस्तक्षेपानंतर प्रकरण सुटलं.