नवी दिल्ली : रामजन्मभूमीबाबतचे पुरावे असणारी कागदपत्रे 1982 साली आखाड्यावर पडलेल्या दरोड्यावेळी चोरीला गेली आहेत, असा दावा निर्मोही आखाड्याने सुप्रीम कोर्टात केला आहे. सुप्रीम कोर्टाने आखाड्याकडे पुरावे सादर करण्यास सांगितले होते, त्यावर उत्तर देताना निर्मोही आखाड्याने पुरावे मिळवण्यासाठी काही वेळ मागितला आहे. सुप्रीम कोर्टाने आखाड्याची मागणी मान्य केली आहे.


सरकारच्या नियंत्रणापूर्वी विवादित जमीन आपल्या ताब्यात होती, असा दावा निर्मोही आखाडा करत आला आहे. सुप्रीम कोर्टाने आज त्याबाबातचे पुरावे सादर करण्यास सांगितले. परंतु निर्मोही आखाड्याचे वकील कोणत्याही प्रकारचे पुरावे सादर करु शकले नाहीत.

शेकडो वर्षांपासून मंदिरावर तुमचे नियंत्रण होते, असे तुम्ही म्हणता, मग तुम्हाला दिवाणी खटल्यांच्या नियमांनुसार पुरावे सादर करावे लागतील, असे खंडपीठाने निर्मोही आखाड्याच्या वकिलांना सांगितले आहे.