Nine Years Of Modi Govt :  मोदी सरकारला (Modi Government) सत्तेत येऊन नऊ वर्ष पूर्ण होत आहेत. याचमुळे आता मोदी सरकारने (PM Modi) आणि विशेषतः भाजपने जनसंपर्क अभियान राबवण्याचा निर्णय घेतला आहे. 15 मे ते 15 जून असे महिन्याभराचे हे जनसंपर्क अभियान असणार असून, महाराष्ट्रात देखील भाजपच्या वतीने हे अभियान राबवले जाणार आहे. या अभियानाच्या माध्यमातून जनतेच्या मनात भाजपबद्दल काय भावना आहेत, भाजपची सध्यस्थिती काय आहे याचा आढावा घेतला जाणार आहे. 


मोदी सरकार सत्तेत येऊन नऊ वर्षे पूर्ण झालीत तर सरकारच्या दुसऱ्या कारकिर्दीला चार वर्षे पूर्ण झाली आहेत. मोदी सरकार 2.0 ने दोन वर्षे पूर्ण केल्यानिमित्ताने भाजपच्या प्रत्येक खासदार आणि आमदारावर  जबाबदारी देण्यात आली आहे.  खासदार आणि आमदारांना हे अभियान आपल्या मतदारसंघात राबवण्यास सांगितले आहे.


या अभियानांतर्गत भाजपचे खासदार शिक्षक, वकिल, खेळाडू, कलाकार, व्यापारी यांच्या संपर्कात राहणार आहे. तसेच मोदी सरकारच्या योजनांचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांशी संपर्क साधण्यास सांगितले आहे. योजनांचा काय लाभ झाला, जीवनात काय बदल झाले  हे सांगणाऱ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यास सांगितले आहे.


नवीन मतदारांना आकर्षिक करण्यासाठी प्रयत्न


येत्या निवडणुकीत भाजप नवीन मतदारांना आकर्षित  करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. यासाठी सामाजिक कार्यकर्ते. पत्रकार आदींशी संपर्क सांधण्यास सांगितले आहे. भाजपचे आमदार, खासदार यांना कामगार,  महिला, युवकांशी संपर्क साधण्याचे आदेश दिले आहेत. 


मोदी सरकारला नऊ वर्षे पूर्ण


नऊ वर्षापूर्वी नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भाजपचं सरकार सत्तेत आलं होतं. नऊ वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान म्हणून शपथ घेतली होती. पंतप्रधान म्हणून शपथ घेतल्यानंतर नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारसमोर अनेक आव्हानं होती. पहिल्या पाच वर्षात त्यांनी या आव्हानांचा सामना करत लोकांना विकासाचं स्वप्न दाखवत अनेक योजना आणल्या अनेक महत्वाच्या घोषणा केल्या. याच बळावर 2019 मध्ये ते दुसऱ्यांदा सत्तेत आले. आता मोदी सरकार सत्तेत येऊन नऊ वर्ष पूर्ण होत आहेत. 


सरकारच्या योजनाही लोकांपर्यंत पोहोचवण्याचे नियोजन


मोदी सरकारच्या कार्यकाळाच्या नवव्या वर्धापन दिनानिमित्त केंद्रीय मंत्री उपस्थित राहणार आहेत. ही टीम मोदी सरकारला 9 वर्षे पूर्ण झाल्यानंतर होणारे कार्यक्रम ठरवणार आहे. देशभरात कार्यक्रमांसोबतच सरकारच्या योजनाही लोकांपर्यंत पोहोचवण्याचे नियोजन केले जात आहे. आगामी देशभरात भाजप कमकुवत असलेल्या बूथवर भाजप मजबूत करण्यासाठी काम करणार आहे.