नवी दिल्ली : वाढत्या प्रदूषणामुळे दिल्लीत अखेर वाहनांसाठी सम-विषम अर्थात ऑड-ईव्हन योजना लागू होणार आहे. सोमवारपासून ही योजना लागू होणार असून पुढचे ५ दिवस कायम राहणार आहे.

कार, बस, दुचाकी अशा सर्व प्रकारच्या वाहनांना ही योजना लागू असेल, शिवाय रुग्णवाहिकांसारख्या तातडीच्या सेवा वगळता कुणालाही व्हीव्हीआयपी ट्रीटमेंट दिली जाणार नाही. राष्ट्रीय हरित लवाद प्राधिकरणानं काही अटींसह केजरीवाल सरकारला याची परवानगी दिली आहे.

दिल्लीत ज्या गाडीचा शेवटचा नंबर २, ४, किंवा ६ अशा सम संख्येचा असेल,अशीच वाहनं ठराविक दिवशी दिल्लीत धावू शकतात. त्याचप्रमाणे विषम संख्येचा नंबर असणाऱ्या गाड्यांनाही असाच नियम लागू असेल.

यामुळे गाड्यांची संख्या कमी होऊन प्रदूषणाला आळा बसेल, असा विचार केजरीवाल सरकारचा आहे.  दिल्लीकर गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रदूषणाला तोंड देत आहेत. त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला गेला आहे.