New Parliament Gifts For MPs: देशाच्या 75 वर्षांच्या संसदीय प्रवासाचा इतिहास जपणाऱ्या जुन्या संसदेचा आज मंगळवारी (19 सप्टेंबर) निरोप घेतला जाणार आहे. नवीन संसदेत खासदारांचा प्रवेश सकाळी 11 वाजता होईल, पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) स्वतः सर्व खासदारांचं स्वागत करणार आहेत. हा विशेष दिवस ऐतिहासिक बनवण्यासाठी संसद, राज्यसभा (Rajya Sabha) आणि लोकसभा (Lok Sabha) या दोन्ही सभागृहांच्या सदस्यांना विशेष भेटवस्तू देण्यात येणार आहेत. भेटवस्तूंमध्ये संविधानाची प्रत, 75 रुपयांचं चांदीचं नाणं आणि नवीन संसदेचा शिक्का असलेली पुस्तिका यांचा समावेश आहे. याशिवाय संसद भवनाच्या सीलसह इतर अनेक भेटवस्तूही यात असतील.


सेंट्रल हॉलमध्ये विशेष कार्यक्रम


पंतप्रधान नरेंद्र मोदी सकाळी 11 वाजता संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये पोहोचतील. पंतप्रधानांसोबत लोकसभा आणि राज्यसभेतील ज्येष्ठ मंत्री आणि खासदारही असतील. यावेळी सेंट्रल हॉलमध्ये एक कार्यक्रम होणार असून त्यात भारताला 2047 पर्यंत समृद्ध राष्ट्र बनवण्याची प्रतिज्ञा घेतली जाणार आहे. सेंट्रल हॉलमधून पंतप्रधान संविधानाची प्रत घेऊन नवीन इमारतीकडे जातील. सर्व खासदार पीएम मोदींना फॉलो करतील. 


नवीन संसदेत प्रवेश केल्यानंतर, औपचारिक पूजा करावी लागेल, ज्यासाठी किमान दीड तास लागू शकतो. यानंतर, दुपारी ठीक दीड वाजता नवीन संसद भवनात कामकाज सुरू होईल. तर राज्यसभेचे कामकाज दुपारी 2.15 वाजता सुरू होईल.


आज गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर नव्या संसद भवनात कामकाजाचा 'श्रीगणेशा' 


देशाच्या विकासाचा गाडा अधिक वेगानं हाकण्यासाठी, नवं संसद भवन सज्ज झालं आहे. आज गणेश चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर संसदेच्या विशेष अधिवेशनाचं कामकाज नव्या संसद भवनातून सुरू होणार आहे. मंगळवारी (19 सप्टेंबर) संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये देशाच्या संसदीय वारशाचे स्मरण करण्यासाठी आणि 2047 पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनविण्याची शपथ घेण्यासाठी एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या समारंभाचे नेतृत्व उपाध्यक्ष जगदीप धनखर, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला करणार आहेत. अंदाजे दीड तास हा सोहळा सुरू राहणार असून त्याची सुरुवात आणि शेवट राष्ट्रगीतानं होणार आहे. त्यानंतर दुपारचं जेवण होईल आणि मग प्रमुख नेते सर्व खासदारांना नवीन संसद भवनात घेऊन जातील.


राज्यसभेच्या बुलेटिनमध्ये नमूद करण्यात आलं आहे की, "भारतीय संसदेच्या समृद्ध वारशाचं स्मरण करण्यासाठी आणि 2047 पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्याचा संकल्प करण्यासाठी राज्यसभा आणि लोकसभेच्या सदस्यांना 19 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता एका कार्यक्रमात उपस्थित राहण्याची विनंती आहे. दुपारी 1 वाजता संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये उपस्थित राहावं."