रांची : छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात सीआरपीएफचे 25 जवान शहीद झाले आहे, तर 6 जवान गंभीर जखमी झाले आहेत.


सुकमा जिल्ह्यातील चिंतागुफा परिसरात सीआरपीएफच्या बटालियन 74 वर नक्षलवाद्यांनी हल्ला केला आहे. या बटालियनमध्ये 90 जवान होते. यात जखमी झालेल्या जवानांना रायपूरच्या रामकृष्ण हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे.

सुकमातील चिंतागुफामध्ये रस्ते बांधणीचं काम सुरु होतं. तेथील कामगारांना साहित्य पोहोचवण्यासाठी जवान निघाले होते. दुपारी जेवण करत असताना जवानांवर हा हल्ला करण्यात आला. यावेळी नक्षलवाद्यांनी जवानांची हत्यारही पळवली आहेत. जवानांवर हल्ला करण्यासाठी नक्षलवादी नेहमीच बॉम्बहल्ला करतात, मात्र आज गोळीबार करत सीआरपीएफ जवानांवर हल्ला करण्यात आला आहे.

या हल्ल्यानंतर छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमण सिंह यांनी तातडीची बैठक बोलावली आहे. तर दिल्लीत केंद्रीय गृह सचिव राजीव महर्षी यांनी हल्ल्यानंतर उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलावली आहे. केद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर रायपूरमध्ये जाऊन परिस्थितीचा आढावा घेणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदींची जवानांना श्रद्धांजली

"छत्तीसगडमध्ये सीआरपीएफ जवानांवर झालेला हल्ला भ्याड आणि दुर्दैवी आहे. आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत. प्राणांची पर्वा न करता चोख प्रत्युत्तर देणाऱ्या जवानांचा आम्हाला अभिमान आहे. शहिदांच्या कुटुंबियांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत." पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट करुन शहिदांना श्रद्धांजली वाहिली आहे.



राष्ट्रपतींकडून सुकुमात शहीद जवानांना श्रद्धांजली

"छत्तीसगडमधील सुकुमात सीआरपीएफ जवानांवर झालेल्या हल्ल्याचा मी निषेध करतो, हल्ल्यात शहीद जवानांना श्रद्धांजली आणि जखमी जवान लवकर बरे व्हावेत यासाठी मी प्रार्थना करतो," असं राष्ट्रपती प्रणव मुखर्जींनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांचीही शहिदांना श्रद्धांजली

"सुकमामधील जवानांवर हल्ला ही एक दु:खद आणि दुर्दैवी घटना आहे, नक्षलवाद्यांचं मोठं आव्हानही आहे. हल्ल्यात शहीद जवानांना श्रद्धांजली. शहिदांच्या कुटुंबियांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत." असं राजनाथ सिंह यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

हल्ला झालेला चिंतागुफा परिसर घनदाट जंगलाचा आहे. सुकमा जिल्ह्यातील या भागाला नक्षलवाद्यांची राजधानी म्हणूनही ओळखलं जातं.

दरम्यान दीड महिन्यापूर्वीच 11 मार्च 2017 रोजी सुकमा जिल्ह्यातच नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात 12 जवान शहीद, तर 3 जवान जखमी झाले होते. नक्षलवाद्यांनी बंद केलेला रस्ता पूर्ववत करण्याच्या कामात गुंतलेले असताना घातपातानं 12 जवानांवर हल्ला केला होता.

जखमी जवानाची पहिली प्रतिक्रिया

"हल्लेखोर नक्षलवादी 300 हून अधिक होते आणि आम्ही जवळपास 150 होतो. आम्ही नक्षलवाद्यांच्या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर दिलं. मी जवळपास 3-4 नक्षलवाद्यांना कंठस्नान घातलं," अशी माहिती जखमी सीआरपीएफ कॉन्स्टेबल शेर मोहम्मद यांनी दिली.