National Science Day 2021 : देशभरात 28 फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. 28 फेब्रुवारी 1928 रोजी भारतीय भौतिकशास्त्रज्ञ, सर चंद्रशेखर वेंकट रामन यांनी रामन परिणामाचा (Raman Effect)शोध लावला. यासाठी त्यांना 1930 मध्ये नोबेल पुरस्काराने गौरवण्यात आले. तेव्हापासून 28 फेब्रुवारी हा दिवस भारतामध्ये 'राष्ट्रीय विज्ञान दिवस' म्हणून साजरा केला जातो. भारतात शास्त्रीय, शैक्षणिक, वैद्यकीय, तांत्रिक, संशोधन आणि सर्व महाविद्यालये, विद्यापीठे, शैक्षणिक संस्था, शास्त्रज्ञ, संशोधक हा दिवस खूप उत्साहाने साजरा करतात. भारतीयांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोण रुजला जावा हे याचं उद्दिष्ट आहे.


चंद्रशेखर वेंकट रामन यांनी कोलकाता विद्यापीठात 1917-1933 भौतिकशास्त्राचे प्राध्यापक म्हणून काम केले. तेथेच त्यांनी भौतिक शास्त्र विभागाचे प्रमुख पद भूषवले. तसेच 1947 साली ते बंगळुरुमधील रामन संशोधन संस्थेचे संचालक होते. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अनेक संशोधन संस्था आणि विद्यापीठांना उभारणीत रामन यांचा मोलाचा वाट होता. त्यांच्या या कामगीरीसाठी त्यांना 1954 साली भारत सरकारकडून भारतरत्न या सर्वौच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 21 नोव्हेंबर 1970 रोजी त्यांचे बंगळुरुमध्ये निधन झाले.
'रमन इफेक्ट'साठी 'भारतरत्न'ने गौरव


सर्वोच्च पुरस्कार 'भारतरत्न'ने गौरव


भारतात 1986 पासून दरवर्षी 28 फेब्रुवारी 'राष्ट्रीय विज्ञान दिन' म्हणून साजरा केला जातो आहे. भौतिकशास्त्रातील आपल्या संशोधनामध्ये त्यांना रामन इफेक्टचा शोध लावला. याच संशोधनातून पुढे रामन स्कॅटरींगचा शोध लागला. जेव्हा एखादा प्रकाशाचा किरण धुळ कण विरहीत, पारदर्शक रासायनिक संयोगातून जातो त्यावेळी त्यातील प्रकाशाचा काही अंश येणाऱ्या किरणाच्या विरुद्ध दिशेला तयार होतो. हा पसरलेला प्रकाशाचे किरण एकाच तरंगाचे असतात. मात्र, काही प्रकाश किरण हे सोडण्यात आलेल्या प्रकाशाच्या किरणांहून वेगळ्या तरंगाचे असतात यालाच रामन इफेक्ट असे म्हणतात. या शोधासाठी त्यांना नोबेल व्यतिरिक्त 1954 मध्ये सर्वोच्च भारतीय पुरस्कार 'भारतरत्न'ने गौरवण्यात आलं.


राष्ट्रीय विज्ञान दिनाचे उद्दीष्ट


विज्ञानात रुची वाढवण्यासाठी आणि समाजात विज्ञानाविषयी जागरूकता निर्माण व्हावी यासाठी राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केला जातो. 'राष्ट्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान परिषद' व 'विज्ञान आणि तंत्रज्ञान' मंत्रालयाकडून या दिवशी देशभरात अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. राष्ट्रीय विज्ञान दिनाचे मुख्य उद्दीष्ट म्हणजे देशातील विज्ञानाची निरंतर प्रगती कायम ठेवणे. यासह, देशात अणुऊर्जेविषयी असलेली लोकांच्या मनातील भीती दूर करणे हे त्याचे मुख्य उद्दीष्ट आहे. केवळ अणुऊर्जेने देशाचा अथक विकास सुनिश्चित केला जाऊ शकतो. समाजातील लोकांचे जीवनमान उंचावेल आणि विकसित होऊ शकेल, हे उदिष्ट असते.


राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त बहुतेक शाळा, महाविद्यालये आणि प्रशिक्षण संस्थांमध्ये विज्ञान संबंधित अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात. याशिवाय विज्ञान संस्था, विज्ञान प्रयोगशाळा, विज्ञान अकादमींमध्ये अनेक वैज्ञानिक कार्यक्रम आयोजित केले जातात. या दिवशी भाषण, निबंध, लेखन, विज्ञान प्रश्नोत्तरी, विज्ञान प्रदर्शन, चर्चासत्र व चर्चासत्राचे आयोजन केले जाते. मात्र यंदा कोरोनामुळे अनेक ठिकाणी या कार्यक्रमांचं आयोजन करता येणार नाही.