सर्जिकल स्ट्राईकवरुन उर बडवणाऱ्या आणि गरजेपेक्षा जास्त बोलणाऱ्या नेत्यांना मोदींनी सक्त ताकीद दिली आहे. विरोधी पक्षांकडून वाकयुद्ध टाळण्याच्या दृष्टीने मोदींनी ही सावध पावलं उचलली आहे. सर्जिकल स्ट्राईकनंतर सर्वच पक्षांमध्ये एकजूट पाहायला मिळाली आहे. काँग्रेससह सर्वच विरोधीपक्षांनी मोदी सरकारला पाठिंबा दर्शवला आहे.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मात्र मोदींकडे स्ट्राईकचे पुरावे मागितले. त्यानंतर काँग्रेसमधील दिग्गज नेते दिग्विजय सिंह यांच्यासह मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनीही सर्जिकल स्ट्राईकच्या सत्यतेबाबत सवाल उपस्थित केले होते. त्यानंतर मात्र काँग्रेसनेही भाजप राजकीय स्वार्थापायी स्ट्राईकचा वापर करत असल्याचा आरोप केला.
दहशतवादाविरोधात भारतीय लष्कराने केलेल्या कारवाईचं श्रेय लाटणं, हे असमंजसपणाचं लक्षण असल्याचं मोदींसह भाजपाध्यक्ष अमित शाहंनी पक्षातील सर्वांनाच सुनावलं आहे.