चेन्नई : तमिळ भाषेचा अभिमान असल्याचं सांगणारे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन त्यांची सही मात्र इंग्रजीमध्ये करतात. त्यावेळी त्यांचा तमिळ भाषेचा अभिमान कुठे जातो? असा प्रश्न करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांच्यावर जोरदार टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (6 एप्रिल) रामेश्वरममधील नवीन पंबन रेल्वे पुलाचे उद्घाटन केले. यानंतर एका रॅलीला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन आणि त्यांचा पक्ष द्रमुक यांच्यावर भाषेचा वाद वाढवल्याबद्दल निशाणा साधला.
एमके स्टॅलिन यांच्यावर ताशेरे ओढत पंतप्रधान मोदी म्हणाले, "तामिळनाडूचे मुख्यमंत्री तमिळ भाषेचा अभिमान असल्याचं सांगतात. परंतु त्यांनी मला लिहिलेली पत्रे आणि त्यावरील स्वाक्षऱ्या केवळ इंग्रजीत आहेत. सही करताना ते तमिळ भाषा का वापरत नाहीत? त्यांचा तमिळ भाषेचा अभिमान कुठे जातो?"
तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांनी केंद्राच्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाचा विरोध करत त्रिभाषिक सूत्र लागू करण्यास नकार दिला आहे. तामिळनाडूमध्ये हिंदी लादण्याचा प्रयत्न करू नका असं म्हणत त्यांनी केंद्राच्या धोरणांवर टीका केली होती. त्यावरून आता पंतप्रधानांनीही स्टॅलिन यांच्यावर टीका केली आहे.
तमिळ भाषेत वैद्यकीय अभ्यासक्रम
तामिळनाडू सरकारला आवाहन करताना पीएम मोदी म्हणाले, "तामिळनाडूमध्ये 1400 हून अधिक जनऔषधी केंद्रे आहेत. येथे 80 टक्के सवलतीत औषधे उपलब्ध आहेत. यामुळे तमिळनाडूच्या लोकांची 7 हजार कोटी रुपयांची बचत झाली आहे. देशातील तरुणांना डॉक्टर होण्यासाठी परदेशात जाण्याची गरज नाही. यासाठी गेल्या काही वर्षांमध्ये तामिळनाडूसाठी 11 वैद्यकीय महाविद्यालये मंजूर करण्यात आली. त्यामुळे गरिबांची मुलं आता डॉक्टर होऊ शकतात. मी तामिळनाडू सरकारला सांगू इच्छितो की ते तमिळ भाषेत वैद्यकीय अभ्यासक्रम सुरू करावा. जेणेकरून गरीब कुटुंबातील मुले आणि मुली ज्यांना इंग्रजी येत नाही ते देखील डॉक्टर होऊ शकतात."
पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे म्हणाले की, "गेल्या 10 वर्षांत भारताने आपल्या अर्थव्यवस्थेचा आकार दुप्पट केला आहे. अशा जलद वाढीचे प्रमुख कारण म्हणजे आपली उत्कृष्ट आधुनिक पायाभूत सुविधा. गेल्या 10 वर्षात आम्ही रेल्वे, रस्ते, विमानतळ, पाणी, बंदर, वीज, गॅस पाइपलाइन आणि अशा पायाभूत सुविधांचे बजेट जवळपास 6 पटीने वाढवले आहे."
'तामिळनाडूच्या रेल्वे विकासासाठी 6000 कोटी रुपये
तामिळनाडूची क्षमता लक्षात घेतली तर देशाचा सर्वांगीण विकास अधिक चांगला होईल असे पंतप्रधान मोदी म्हणाले. 2014 पूर्वी रेल्वे प्रकल्पांसाठी दरवर्षी केवळ 900 कोटी रुपये मिळत होते. या वर्षी तामिळनाडूचे रेल्वे बजेट 6,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे आणि भारत सरकार देखील येथील 77 रेल्वे स्थानकांचे आधुनिकीकरण करत आहे. यामध्ये रामेश्वरम रेल्वे स्थानकाचाही समावेश आहे. विकसित भारताच्या प्रवासात तामिळनाडूचा मोठा वाटा आहे. माझा विश्वास आहे की, तामिळनाडूची क्षमता जितकी वाढेल, तितकीच भारताचा विकास होईल असा विश्वास मोदींनी व्यक्त केला.
ही बातमी वाचा: