नवी दिल्ली : देशातील सर्वच पक्ष आगामी लोकसभा निवडणुकांसाठी तयारी करु लागले आहेत. सर्वच पक्षांचे नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करु लागले आहेत. आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनीदेखील विरोधकांवर हल्ला चढवला आहे. मोदी म्हणाले की, "विरोधी पक्ष सातत्याने ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. विरोधकांनी निवडणुकीआधीच पराभवाचा बहाणा शोधून ठेवला आहे."


व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे मोदींनी आज बुध पातळीवरील कार्यकर्त्यांशी संवाद साधला. ते म्हणाले की, कोणताही राजकीय पक्ष निवडणूक जिंकू इच्छितो, ही एक स्वाभाविक गोष्ट आहे. काही ठराविक लोकांना जनतेने आशिर्वाद दिल्यानंतर उर्वरीत पक्षांचे नेते बैचेन होतात. ते लोकांना मूर्ख समजतात. त्यामुळे लोकांची मनं जिंकण्यासाठी ते रंग बदलतात.

मोदी म्हणाले की, "विरोधकांचा कोणत्याही सांवैधानिक संस्थेवर विश्वास राहिला नाही. त्यामुळेच ते सातत्याने या संस्थांना बदनाम करत सुटले आहेत."

कोलकात्यामध्ये शनिवारी ममता बॅनर्जी यांनी विरोधकांना एकत्र घेऊन महामेळाव्याचे आयोजन केले होते. यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांना लक्ष्य केले. मोदी म्हणाले की "विरोधकांनी महाआघाडी केली आहे आणि आम्ही सुद्धा केली आहे. त्यांनी इतर पक्षांना एकत्र घेऊन महाआघाडी केली आहे. परंतु आम्ही देशातील सव्वाशे कोटी जनतेसोबत आघाडी केली आहे."