‘जनपथ’वरुन नव्हे, ‘जनमता’ने सरकार चालवतो : मोदी
एबीपी माझा वेब टीम | 26 May 2018 10:57 PM (IST)
ओदिशातील कटक येथे जनतेला संबोधित करताना नरेंद्र मोदींनी आपल्या सरकारचे रिपोर्ट कार्ड सादर केले. आपला देश बदलू शकतो, असं गेल्या चार वर्षांत 125 कोटी भारतीयांना वाटत असल्याचही मोदी म्हणाले.
कटक : केंद्र सरकारला झालेल्या चार वर्षाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्व विरोधकांवर तुटून पडलेत. भ्रष्टाचाराविरोधातील कारवाईच्या भीतीने विरोधक एका व्यासपीठावर आले आहेत. हे ऐक्य देशासाठी नाही तर स्वत:च्या बचावासाठी आहे, अशा शब्दांत मोदींनी विरोधकांच्या ऐक्यावर निशाणा साधला. तसेच सोनिया गांधींचं नाव न घेता, "आम्ही 'जनपथ'वरुन नाही तर 'जनमता'ने सरकार चालवतो", असा टोलाही मोदींनी लगावला. ओदिशातील कटक येथे जनतेला संबोधित करताना नरेंद्र मोदींनी आपल्या सरकारचे रिपोर्ट कार्ड सादर केले. आपला देश बदलू शकतो, असं गेल्या चार वर्षांत 125 कोटी भारतीयांना वाटत असल्याचही मोदी म्हणाले. “दोन वर्षात 25 नवे विमानतळ बनवले. देशात रस्त्याची कमं जोरात सुरु आहेत. स्ट्रीट लाईट्समध्ये एलईडी बल्बल लावले. 2022 पर्यंत सर्व गरिबांना घरं देण्याच्या दिशेने सरकार काम करत आहे. शेतकऱ्यांचं मिळकत दुप्पट करण्याचा उद्देश आहे. 4 कोटी घरात वीज आणि 10 कोटी गॅस कनेक्शन सरकारने दिले आहेत”, असे सांगत नरेंद्र मोदी यांनी गेल्या चार वर्षातील सरकारच्या कामांचा पाढा वाचला.