नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज केंद्रीय कॅबिनेटची (Cabinet) बैठक पार पडली. या मंत्रिमंडळ बैठकीत शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले असून गहू, मोहरीसह 6 पिकांच्या हमीभावात वाढ करण्यात आली आहे. यापूर्वी गत बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत पोषणतत्वांनी संपन्न असा तांदूळ मोफत देण्यात येतो त्यास आणि इतर कल्याणकारी योजनेंतर्गत  मुदत जुलै 2024 वरुन डिसेंबर 2028 पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला. केंद्र सरकारच्या या योजनेमुळं 80 कोटी पात्र लाभार्थ्यांना मोफत अन्नधान्य मिळणार आहे. त्यानंतर, आज झालेल्या बैठकीत शेतकऱ्यांना (Farmer) डोळ्यासमोर ठेऊन केंद्र सरकारने 6 पिकांच्या हमीभावाच्या रकमेत वाढ केली आहे. त्यामध्ये, गव्हाच्या हमीभावात 150 रुपयांची वाढ, तर मोहरीच्या हमीभावात 300 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. 


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज पार पडलेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत 6 पिकांच्या हमीभावात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे, देशभरातील कोट्यवधी शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. महाराष्ट्रातील गहू उत्पादक आणि हरभरा पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे, सरकारच्या या निर्णयाचा राज्यातील शेतकऱ्यांनाही मोठा लाभ होईल. 


1. गहू - 150 रुपयाची वाढ आता 2 हजार 475 रूपये क्विंटल हमीभाव असणार


2. मोहरीच्या किंमतीत - 300 रुपयांची वाढ, आता 5 हजार 950 रूपये क्विंटल हमीभाव असणार


3. जवसाच्या किंमतीत 130 रुपयांची वाढ आता 1 हजार 980 रूपये क्विंटल हमीभाव असणार


4. हरभऱ्याची किंमतीत - 210 रुपयाची वाढ होऊन 5 हजार 650 रूपये क्विंटल हमीभाव असणार


5. मसूराच्या किंमतीत 275 रुपयांची वाढ होऊन आता 6 हजार 700 रूपये क्विंटल हमीभाव असणार


6. करडईच्या किंमतीत 140 रुपयाची वाढ होऊन आता 5 हजार 940 रूपये क्विंटल हमीभाव असणार आहे. 


महागाई भत्त्यात 3 टक्क्यांची वाढ


केंद्र सरकारने आजच्या कॅबिनेट बैठकीत लाखो कर्मचारी आणि पेन्शनर्स यांच्यासाठी देखील मोठा निर्णय घेतला आहे. दिवाळीपूर्वीच केंद्र सरकारच्या सेवेतील कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या कॅबिनेटची बैठक आज पार पडली. या बैठकीत डीए आणि डीआरमध्ये 3 टक्के वाढ करण्यास मंजुरी दिली आहे. महागाई भत्ता वाढवण्यात आला असून तो 1 जुलै 2024 पासून लागू असेल. यामुळं लाखो कर्मचारी आणि पेन्शनर्सला लाभ होणार आहे. केंद्राच्या सेवेत 49 लाख कर्मचारी आहेत तर, 60 लाख निवृत्तीवेतनधारक आहेत.  


मोफत तांदूळ योजना 2028 पर्यंत


दरम्यान, गत आठवड्यातील केंद्रीय कॅबिनेट बैठकीत प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत पोषणतत्वांनी संपन्न असा मोफत तांदूळ देण्याच्या योजनेला वाढ देण्यात आली आहे. सन 2028 ही पर्यंत ही मोफत तांदूळ योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेला केंद्र सरकारकडून 100 टक्के अर्थसहाय्य करण्यात येतं. या योजनेद्वारे देशभरातील पात्र रेशन कार्ड धारकांना मोफत तांदूळ वितरण केलं जातो. या योजनेद्वारे रेशनकार्ड धारकांना दरमहा 5 किलो तांदूळ देण्यात येतो. आता केंद्र सरकारनं या योजनेला मुदतवाढ देताना पोषणतत्त्वांनी समृद्ध असा तांदूळ मोफत पुरवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 


हेही वाचा


धक्कादायक! 11 वर्षीय मुलावर 9 जणांकडून सामूहिक अत्याचार; आईच्या फिर्यादीनंतर गुन्हा दाखल