कोलकाता: मी आधी भारतीय जनतेचा आहे आणि मग भारतीय जनता पार्टीचा आहे. जोपर्यंत पंतप्रधान बोलणार नाहीत, तोपर्यंत 'चौकीदार चोर है' ही टीका ऐकून घ्यावीच लागेल, अशा शब्दात भाजप खासदार खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी पुन्हा भाजपाला घरचा आहेर दिला. विरोधकांच्या महारॅलीला संबोधित करताना खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी विरोधकांची एकी शानदार असल्याचं म्हणत त्यांनी महाआघाडीतील अनेकांचं तोंडभरुन कौतुक केलं.


सिन्हा म्हणाले, नोटाबंदीचा निर्णय पक्षाचा नव्हता. हा निर्णय मनमानीपणाचा नमुना होता. तो निर्णय पक्षाचा असता, तर लालकृष्ण आडवाणी, मुरली मनोहर जोशींना याची कल्पना असती. रातोरात हा निर्णय घेण्यात आला.  आपल्या माता-भगिनींनी चांगल्या हेतूनं ज्या पैशांची बचत केली, तेच पैसे बँकेत जमा करण्यासाठी त्यांना रांगा लावल्या लागल्या', अशा शब्दांमध्ये सिन्हा यांनी  मोदींवर टीका केली. यावेळी तीन राज्यांमध्ये काँग्रेसनं मिळवलेल्या विजयाबद्दल त्यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींचं अभिनंदन केलं.

देशाला परिवर्तनाची गरज आहे. परिवर्तन घडवण्याचा निश्चय जनतेनं केला आहे. त्यामुळे लवकरच देशात बदल घडेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. खरं बोलणं ही जर बंडखोरी असेल तर मी बंडखोर आहे असं म्हणत सिन्हा यांनी मोदी आणि भाजपाविरोधात दंड थोपटले आहेत.
लोकसभा निवडणुकीसाठी विरोधकांनी वज्रमूठ बांधली
2019 च्या लोकसभा निवडणुकीसाठी विरोधकांनी एकत्र वज्रमूठ बांधली आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी शनिवारी कोलकाता येथे भाजप विरोधकांना एकत्र आणणारी ‘भारतीय एकता सभा’ आयोजित केली. ही सभा भाजपविरोधातील आघाडीचा आणखी एक प्रयत्न असल्याचे मानले जात आहे. या सभेत शरद पवार, फारुख अब्दुल्ला, जिग्नेश मेवाणी, हार्दिक पटेल, शरद यादव, अरविंद केजरीवाल अशा विविध पक्षाची नेतेमंडळी उपस्थित होती. विरोधकांसह भाजपचे बंडखोर शत्रुघ्न सिन्हा आणि यशवंत सिन्हा हे देखील महारॅलीला उपस्थित होते. या सभेत सर्वच विरोधकांनी भाजप आणि नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली.

मोदी शेतकरी विरोधी आहेत. त्यांनी घटनात्मक संस्थांचा ऱ्हास केला. देशात अघोषित आणीबाणी आली आहे. मोदींनी सबका साथ घेऊन सबका विनाश केला, असे घणाघाती शाब्दिक हल्ले आज कोलकात्यातील विरोधकांच्या संयुक्त भारत मेळ्यातून पंतप्रधान मोदींवर करण्यात आले.

आगामी लोकसभा निवडणुकीत मोदी आणि भाजपला रोखण्यासाठी देशभरातील विरोधक एकाच मंचावर आले आहेत. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी कोलकात्यात भारतीय एकता सभेचं आयोजन केलं होतं. ही सभा भाजपविरोधी आघाडी निर्माण करण्यासाठीचा नवा प्रयत्न असल्याचं मानलं जातंय. ममता यांनी आयोजित केलेल्या या सभेत देशभरातील 22 विरोधी पक्षांचे नेते सहभागी झाले आहेत. यात देशभरातील प्रादेशिक पक्षांचा सहभाग अधिक आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी मात्र या सभेला गैरहजर राहिले. विरोधकांसह भाजपचे बंडखोर नेते यशवंत सिन्हा आणि शत्रुघ्न सिन्हादेखील उपस्थित राहिले.

मोदी सरकारची ‘एक्सपायरी डेट’आता संपली : ममता बॅनर्जी  

मोदी सरकारची ‘एक्सपायरी डेट’आता संपली आहे. भाजप भगाओ - देश बचाओ या नाऱ्याला प्रत्यक्षात आणण्याची वेळ आली आहे, असे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यावेळी म्हणाल्या. तसेच पंतप्रधान पदाचा आमचा उमेदवार निवडणुकीनंतर घोषित केला जाईल, असेही त्या म्हणाल्या. राजकारणात शिष्टता असते मात्र भाजप त्याचे पालन करत नाही. जे भाजपसोबत नाहीत त्यांना चोर समजले जाते. आपल्याला एकत्रित येऊन काम करायला हवे, असेही बॅनर्जी म्हणाल्या.

धर्माच्या आधारे लोकांचे विभाजन केले : अब्दुल्ला
मी मुस्लीम आहे, पण मी देखील भारतातील एक भाग आहे. जम्मू- काश्मीरमध्ये राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाला भारतासोबत रहायचे आहे, असे त्यांनी सांगितले.
स्वातंत्र्य मिळून ७० वर्ष झाल्यानंतर देशासमोर आता एक नवीन आव्हान निर्माण झाले आहे. धर्माच्या आधारे लोकांचे विभाजन केले जात असून आता देशाचे रक्षण करायचे असल्यास सर्वांनी पुन्हा एकत्र येणे गरजेचे आहे. भाजपाला संपवण्यासाठी विरोधी पक्षांनी आगामी निवडणुकीत एकत्र आले पाहिजे, असे आवाहन नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला यांनी केले.