MP Mohan Delkar suicide case:  दादरा नगर हवेली येथील खासदार मोहन डेलकर यांच्या आत्महत्येप्रकरणी मुंबई पोलिसांनी दाखल केलेला गुन्हा अखेर हायकोर्टानं रद्द केला आहे. कायद्याचा गैरवापर टळण्यासाठी हा गुन्हा रद्द करणं आवश्यक असल्याचं मत हायकोर्टानं या निकालात नोंदवल आहे. याप्रकरणी 5 जुलैला राखून ठेवलेला आपला निकाल न्यायमूर्ती प्रसन्न वराळे आणि न्यायमूर्ती श्रीकांत कुलकर्णी यांच्या खंडपीठानं गुरूवारी जाहीर केला. या निकालामुळे याप्रकरणात नाव आलेल्या नऊ बड्या व्यक्तींना मोठा दिलासा मिळाला आहे.
हा गुन्हा रद्द करण्यासाठी दादरा नगर हवेलीचे मुख्य प्रशासक प्रफुल्ल खोडा पटेल यांच्यासह सिव्हासा येथील जिल्हाधिकारी संदिप कुमार सिंह, एसपी शरद दराडे, तत्कालीन उप जिल्हाधिकारी अपूर्व शर्मा, उपविभाग अधिकारी मानसी जैन, सिल्वासा पोलीस निरिक्षक मनोज पटेल,व्यवस्थापकीय अधिकारी रोहित यादव, तलाठी दिलीप पटेल यांच्यासह फत्तेसिंह चौहान या राजकीय पुढा-यानं मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. 


काय आहे प्रकरण -
खासदार मोहन डेलकर यांनी मुंबईतील मरीन ड्राईव्ह येथील हॉटेल सी ग्रीनमध्ये 22 फेब्रुवारी 2021 रोजी पंख्याला लटकून आत्महत्या केली होती. डेलकर यांनी आत्महत्या केल्यानं अनेकांना धक्का बसला होता. दादरा-नगर हवेलीच्या खासदारानं मुंबईत येऊन आत्महत्या का केली?, असा प्रश्न उपस्थित झाला. तसेच गुजराती भाषेत लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये राजकीय नेते, प्रशासकीय अधिकारी आणि काही पोलीस अधिकाऱ्यांकडून सातत्यानं मानसिक छळ होत असल्याचं लिहिलं होतं. याप्रकरणी तपास करून मुंबई पोलिसांनी डेलकारांचा मुलगा अभिनव डेलकर याच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करत चिठ्ठीत नावं लिहिलेल्या सर्वंना आरोपी केलं होतं. 


याचिकाकर्त्यांचा दावा काय?
मात्र मुंबई पोलीसांनी दाखल केलेली एफआयआर बिनबुडाची आणि चुकीची आहे. आपल्याविरोधात या एफआयआरमध्ये कोणताही विशिष्ट आरोप करण्यात आलेला नाही. आपली आणि डेलकरांची कधीही वैयक्तिक ओळख नव्हती, देलकरांच्या संस्थेची आपण फक्त चौकशी केली होती. तसेच ही घटना ही मुंबईत घडली असली तरी कथित गुन्ह्याचे मूळ हे दादरा-नगर हवेलीमध्ये दडलेलं आहे. त्यामुळे एफआयआर तिथं वर्ग होणे अपेक्षित होतं मात्र केवळ राजकीय दबावातून हा गुन्हा दाखल करण्यात आल्याचा दावा जिल्हाधिकारी संदीप सिंह यांनी आपल्या याचिकेतून केला होता. याशिवाय परमबीर सिंह यांच्या लेटर बॉम्बमध्येही याप्रकरणाचा उल्लेख होता. हे प्रकरण दादरा-नगर हवेली पोलिसांकडे वर्ग करायला हवं, असं परमबीर सिंग यांनी वरिष्ठांना सुचवलं होतं. मात्र, राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या दबावामुळे मुंबईत एसआयटी स्थापन करण्यात आल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे यामागचा राजकीय हेतू सिद्ध होतोय असा आरोप या याचिकेतून करण्यात आला होता. 


कोण होते महन डेलकर -
58 वर्षीय मोहन डेलकर हे साल 1989 पासून दादरा आणि नगर हवेली लोकसभा मतदारसंघातून खासदार होते. ते दादरा आणि नगर हवेली येथून तब्बल 7 वेळा खासदार म्हणून निवडून आले होते. साल 2009 मध्ये ते काँग्रेस पक्षात दाखल झाले. परंतु 2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिली आणि अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात उतरत मोठ्या मतांनी पुन्हा विजयी झाले होते.