नवी दिल्लीः मान्सून येत्या 3-4 दिवसात भारताच्या उत्तर-दक्षिण भागातून परतीच्या वाटेवर निघण्याची शक्यता आहे. मान्सून साधारणतः सप्टेंबरच्या पहिल्याच आठवड्यात परततो, मात्र मान्सून यावर्षी जवळपास दोन आठवडे उशीराने जात आहे, अशी माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आहे.


 

उत्तर भारतात नैऋत्य मोसमी पाऊस परतण्यास वातावरण अनुकूल झालं आहे. त्यामुळे येत्या 3-4 दिवसात राजस्थानच्या काही भागातून मान्सून निरोप घेण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. देशात सध्या पडलेला पाऊस सरासरीच्या 5 टक्के कमी आहे. त्यामुळे हवामान विभागाच्या या नव्या भाकीताने चिंता अजून वाढली आहे.

 

सरासरीपेक्षाही कमी पाऊस असताना मान्सूनने निरोप घेण्याच संकेत दिल्याने खरीप हंगामातील पीकं धोक्यात आली आहे. देशभरातील लाखो हेक्टरवर यावर्षीही दुष्काळाचं सावट आहे. दरम्यान हवामान विभागाने सरासरीपेक्षा जास्त पाऊस होणार, असं भाकीत केलं होतं. पण सरासरीच्या कमी पाऊस झाल्याने हवामान खातंही तोंडघशी पडलं आहे.