अवघ्या काही तासातच मान्सून केरळमध्ये दाखल होणार!
एबीपी माझा वेब टीम | 07 Jun 2016 03:13 AM (IST)
त्रिवेंद्रम : पावसाची आतुरतेने वाट पाहणाऱ्यांसाठी खुशखबर आहे. पुढील 36 तासात मान्सून केरळमध्ये दाखल होणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. सलग 3 वर्षांच्या दुष्काळानंतर येणाऱ्या पावसाची शेतकरीही आतुरतेने वाट पाहत आहे. केरळच्या त्रिवेंद्रममध्ये सोमवारी रात्री पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या आहेत. त्यामुळे येत्या चार ते पाच दिवसात महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून ऊन-सावलीचा सुरु असलेला लपंडाव लवकरच संपण्याची चिन्हं आहेत. एबीपी माझाची मान्सून एक्स्प्रेस पावसाची वर्दी देण्यासाठी केरळमध्ये दाखल झाली आहे. केरळच्या वातावरणातील बदलाची माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत. दरम्यान, यंदा सरासरीच्या 106 टक्के पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तर जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या तीन महिन्यात अतिरिक्त पाऊस पडेल, असं भाकितही वर्तवलं आहे.