Weather Update: राज्यात पुढील 3 ते 4 दिवस मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात मान्सूनपूर्व पावसाचा अंदाज देण्यात आलाय. विदर्भात पुढील दोन दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलाय. कोकणात मान्सून पुढे सरकण्यासाठी अद्यापही परिस्थिती अनुकूल नसून 22 जूननंतर पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत आणखी भर पडली आहे. चक्रीवादळ बिपरजॉयचं राजस्थानच्या अनेक भागाना जोरदार फटका बसला आहे.


बिपरजॉय चक्रीवादळाचं राजस्थानमध्ये थैमान 


पाली, सिरोही, राजसमंद, उदयपूर, बाडमेरमध्ये मुसळधार पाऊस पाहायला मिळत आहे. तर राजस्थानमधील 500  हून जास्त गावांचा वीजपुरवठा खंडित झाला आहे.  वाळवंटात पूरस्थिती पाहायला मिळत आहे. विविध दुर्घटनांत तीन जणांचा मृत्यू झाला  आहे.  राजस्थानात 300  मिमी पाऊस झाला आहे. एकीकडे राजस्थान,दिल्ली, मध्यप्रदेशात पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे बिहार, उत्तरप्रदेशात उष्णतेची लाट पाहायला मिळत आहे. 


 झारखंड, पश्चिम बंगालमध्ये उष्णतेपासून दिलासा मिळण्याची शक्यता


हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढील दोन दिवसात बिहार, झारखंड, पश्चिम बंगालमध्ये दिलासा मिळण्याची शक्यता आहे.  पुढील दोन दिवसाचा पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दिल्लीत हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. रविवारी दिल्लीत 38.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. तर किमान तापमान 28.6 अंश सेल्सिअस नोंदवण्यत आले. सामान्य तापमानापेक्षा एका अंशाने हे तापमान अधिक आहे. हवामान विभागाने राजधानी दिल्लीत ढगाळ वातावरण आणि हलक्या  पावसाचा अंदाज वर्तवला आहे. 


आसाम आणि राजस्थामध्ये पूर परिस्थिती 


 आसाममध्ये पावासाने धुमाकूळ घातला आहे. मुसळधार पावसामुळे 
ब्रह्मपुत्रा नदीच्या पात्रात वाढ झाली आहे. आसाममध्ये गेल्या काही दिवसांपासून पावसाची संततधार सुरू असून येत्या पाच दिवसांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. राज्यातील तीन जिल्हे पुराच्या पाण्यात बुडाले आहेत. एवढच नाही तर 25 गावात पूरपरिस्थिती निर्माण झाली असून 215.57 हेक्टर क्षेत्र पाण्याखाली आहे. आसाममधील 10 जिल्ह्यातील जवळपास 38000 नागरिकांना पूराचा फटका बसला आहे. राजस्थानमध्ये बिपोरजॉयमुळे पाली, सिरोही, राजसमंद, उदयपूर, बाडमेरमध्ये  पूर स्थिती निर्माण झाली आहे.  


बिहारमध्ये उष्णतेची लाट


उष्णतेच्या लाट  आणि उष्माघातामुळे उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये गेल्या तीन दिवसांत उष्माघातामुळे जीव गमावणाऱ्यांची संख्या 100 च्या पुढे गेली आहे. सध्य यूपी बिहारसह पूर्ण उत्तर भारतात उष्णतेचा पारा वाढला आहे.भारतीय हवामान विभागाने यूपी आणि बिहारच्या अनेक जिल्ह्यात अलर्ट जारी केला असून काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. हवामान विभागाने  24 तास बिहारच्या बांका, जमुई, जहानाबाद, खगडिया, लखीसराय, नालंदा, नवादा, पटना, समस्तीपूर, शेखपुरामध्ये तीव्र उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे.