गुरुग्राम : नवरात्रौत्सवादरम्यान मांसबदीच्या मुद्द्यावर शिवसेनेची डबलढोलकी समोर आली आहे. एकीकडे मुंबईतल्या जैन संघटनेने पर्युषण काळात लावलेल्या मांसबंदीला विरोध करत असताना, दुसरीकडे ह्याच शिवसेनेने नवरात्रोत्सवात गुरुग्राममधली 600 मटणाची दुकानं बंद पाडली.


हिंदूंसाठी जशी नवरात्र, तसंच जैन धर्मियांसाठी पर्युषण काळ. मग पर्युषणकाळात मांसबंदीला विरोध आणि नवरात्रौत्सवात शिवसेनेला मांसबंदी का हवी?, असा सवाल विचारला जात आहे.

शिवसेनेने गुरुग्रामच्या जुन्या आणि नवीन भागातील 600 मटणाची दुकानं बंद पाडली आणि ही सर्व दुकानं 9 दिवसांसाठी अशीच बंद ठेवण्याची तंबी दिली. "गुरुग्राममध्ये 50 टक्क्यांपेक्षा जास्त मटणाची दुकानं आधीच बंद होती. जी चालू होती, ती पण आम्ही बंद पाडली," असं शिवसेनेचे गुरुग्राम शाखेचे प्रवक्ते रितु राज यांनी सांगितलं.

https://twitter.com/ANI/status/911086834033111040

https://twitter.com/ANI/status/911086163196231680

जबरदस्तीने दुकानं बंद करण्याच्या मुद्द्यावर रितू राज म्हणाले की, "शिवसेनेने आधीच याबाबत गुरुग्राम प्रशासनाला निवेदन दिलं होतं. हिंदूंचा पवित्र सण असलेल्या नवरात्रीदरम्यान ही दुकानं बंद राहायला हवीत, अशी मागणी याद्वारे करण्यात आली होती."

दरम्यान शिवसेनेचा खासदार अरविंद सावंत यांनी संबंधित प्रकार शिवसैनिकांनी केलाच नसल्याचं म्हटलं आहे.