गांधीनगर : माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी पत्रकार परिषद घेऊन पंतप्रधान मोदींना काही सवाल केले आहेत. गुजरात निवडणुकीपूर्वी त्यांनी जीएसटी आणि नोटाबंदीवरुन मोदींवर टीका केली. नोटाबंदीसारखा निर्णय घेण्यापूर्वी मोदींनी गरिबांचा विचार केला का, असा सवाल मनमोहन सिंहांनी केला.


“नोटाबंदी आणि जीएसटीमुळे अर्थव्यवस्था उद्ध्वस्त झाली आहे. त्यामुळे छोट्या उद्योजकांचा कणाच मोडला आहे. देशात टॅक्स टेररिझमसारखी अवस्था आहे. कररुपी दहशतीमुळे भारतीय व्यवसायांतील गुंतवणुकीत घट झाली आहे”, असा दावा मनमोहन सिंह यांनी केला

मनमोहन सिंह यांचे सात सवाल

  1. महात्मा गांधींची आठवण करुन देत, मनमोहन सिंह म्हणाले की, या जगाने दोन गुजराती व्यक्तींना पाहिलंय. महात्मा गांधी म्हणाले होते की, तुम्ही कधीही संभ्रमात असाल तर गरिबांचा चेहरा समोर आणा. मोदींनी स्वतःला विचारावं, की या निर्णयाचा गरिबांना फायदा होईल का?

  2. या निर्णयाने उपासमार संपेल का?

  3. छोट्या क्षेत्राचं काय होईल, याचा विचार नोटाबंदीच्या निर्णयावर सही करण्यापूर्वी केला का?

  4. ज्यांचा रोजगार गेला त्यांच्याबाबत काय विचार केला?

  5. जीएसटी आणि नोटाबंदीबाबत काहीही विचारलं तर आपण लगेच कर चुकवे होतो का?

  6. बुलेट ट्रेनबाबत विचारलेला प्रश्न विकासाच्या विरोधात असल्याचं तुम्हाला वाटतं?

  7. बुलेट ट्रेन आणण्यापूर्वी मोदींनी सध्याच्या हायस्पीड ट्रेन अपग्रेड करण्याबाबत विचार केलाय का?