नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर खालच्या भाषेत टीका करणं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मणिशंकर अय्यर यांना भोवलं आहे. मणिशंकर अय्यर यांचं प्राथमिक सदस्यत्व काँग्रेसने निलंबित केलं आहे. मणिशकंर अय्यर यांनी मोदींना उद्देशून 'नीच प्रवृत्तीचा माणूस' असे शब्द वापरले होते.


मणिशंकर अय्यर यांचं प्राथमिक सदस्यत्व निलंबित करत, मोदींवर खालच्या भाषेत केलेल्या टीकेबाबत कारणे दाखवा नोटीसही काँग्रेसने अय्यर यांना बजावली आहे.



मणिशंकर अय्यर काय म्हणाले होते?

“डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न साकार करण्यासाठी एका व्यक्तीचं मोठं योगदान होतं, त्यांचं नाव म्हणजे जवाहरलाल नेहरु आणि अशा कुटुंबाबद्दल घाणेरडे वक्तव्य केली जातात, तेही डॉ. आंबेडकरांच्या नावाने मोठ्या वास्तूच्या उद्घटनावेळीच. मला वाटतं ही (नरेंद्र मोदी) व्यक्ती अत्यंत नीच प्रकारची आहे. तिच्यात कोणतीही सभ्यता नाही. अशा चांगल्या प्रसंगी घाणेरड्या राजकारणाची काय गरज आहे?”, असे मणिशंकर अय्यर म्हणाले.

राहुल गांधींनीही मणिशंकर अय्यर यांना झापलं!

मणिशंकर अय्यर यांच्या विधानावर राहुल गांधींनीही टीका केली होती. अय्यर यांनी तातडीने माफी मागावी अशी अपेक्षाही राहुल गांधी यांनी व्यक्त केली होती. राहुल गांधी म्हणाले होते की, "भाजप आणि पंतप्रधान मोदी कायमच काँग्रेसविरोधात घाणेरडी भाषा वापरत असतात. मात्र, काँग्रेसचे संस्कार आणि वारसा वेगळा आहे. त्यामुळे मणिशंकर अय्यर यांनी मोदींना उद्देशून वापरलेल्या शब्दाचं मी समर्थन करणार नाही. किंबहुना, काँग्रेस पक्ष आणि मी अशी अपेक्षा करतो की, त्यांनी मोदींबाबत वापरलेल्या शब्दाबद्दल माफी मागावी."

आता मणिशंकर अय्यर यांच्यावर काँग्रेसने कारवाई करत पक्षाचं प्राथमिक सदस्यत्वच निलंबित केले आहे.

संबंधित बातमी : मोदी 'नीच', मणिशंकर अय्यर यांची जीभ घसरली, टीकेनंतर माफीनामा