मुंबई : भारतातील सर्वात मोठ्या इंजिनिअरिंग फर्म्सपैकी एक असलेल्या 'लार्सन अँड टुब्रो' कंपनीतून कर्मचाऱ्यांची कपात करण्यात येत आहे. एकूण कर्मचारीसंख्येपैकी 11.2 टक्के म्हणजेच सुमारे 14 हजार जणांना कंपनीतून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. अलिकडच्या काळातील ही सर्वात मोठी कर्मचारीकपात (लेऑफ) मानली जात आहे. व्यवसायात आलेल्या मंदीमुळे कंपनीतील वर्कफोर्स योग्य आकड्यावर आणण्याची गरज होती. त्यामुळेच हा निर्णय घेण्यात आल्याचं 'लार्सन अँड टुब्रो' कंपनीतर्फे सांगण्यात आलं आहे. डिझीटायजेशन आणि उत्पादकता वाढवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांमुळे काही कर्मचाऱ्यांना कमी करण्यात आल्याचं सांगितलं जातं. 'इकॉनॉमिक टाइम्स'ने यासंदर्भात वृत्त दिलं आहे. योग्य कर्मचाऱ्यांची निवड करण्यासाठी कंपनीतर्फे मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करण्यात आले. एप्रिल महिन्यात एल अँड टी फायनान्स कंपनीने साडेपाचशे कर्मचाऱ्यांना नारळ देण्यात आला होता.