C-Voter Survey On Modi Vs Kejriwal : लोकसभा निवडणूक 2024  (Lok Sabha Election 2024) पूर्वी भाजपसह (bjp) अनेकांनी आपली कंबर कसली आहे. भाजपकडून सत्ता काढून घेण्यासाठी सर्वच विरोधी पक्षांनी एकत्र येऊन मोट बांधली आहे. अशातच सध्या देशभरात अरविंद केजरीवाल यांच्या आपचं वर्चस्व वाढताना दिसत आहे. पंजाबमध्ये (Punjab) आप सरकारनं एकहाती सत्ता काबीज केली आणि सत्ताधारी भाजपसह इतर पक्षांनाही धक्का दिला. तर बिहारमध्ये (Bihar) भाजपला धक्का देऊन लालू प्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) यांच्या राजदसोबत (RJD) युती करुन बिहारमध्ये नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी सत्ता स्थापन केली. या दोन्ही घटनांमुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली होती. अशातच अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकांमध्ये (Lok Sabha Election) पंतप्रधान नरेंद्र मोदींना (PM Modi) टक्कर देणार? की अरविंद केजरीवाल यांना मागे टाकत बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार मोदींचा पराभव करणार? असे प्रश्न चर्चेत आहेत. सर्वसामान्यांच्या मनातही यांसारखे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. दरम्यान, सी-व्होटरनं एबीपी न्यूजसाठी एक सर्व्हे केला आहे, ज्यामधून जनतेचा नेमका कौल कोणाला, हे जाणून घेण्यास मदत होईल.


सर्व्हे दरम्यान लोकांना विचारण्यात आलं की, 2024 मध्ये पंतप्रधान मोदींसाठी सर्वात मोठं अव्हान कोण असेल, अरविंद केजरीवाल की, नितीश कुमार?  



  • 65 टक्के लोकांचं म्हणणं आहे की, अरविंद केजरीवाल पंतप्रधान मोदींसाठी आव्हान ठरतील  

  • 35 टक्के लोकांचं म्हणणं आहे की, नितीश कुमार पंतप्रधान मोदींसाठी आव्हान ठरतील


भाजपसमोर आपचं तगडं आव्हान 


दिल्लीतून आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात करणारे अरविंद केजरीवाल आज प्रादेशिक राजकारण सोडून राष्ट्रीय पातळीवर आपल्या पक्षाची विश्वासार्हता निर्माण करण्याच्या प्रयत्नात असल्याचं पाहायला मिळत आहे. दिल्लीतही आपली सत्ता कायम ठेवण्यात आपला यश आलं. अरविंद केजरीवाल दुसऱ्यांदा दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर विराजमान झाले. त्यानंतर हरियाणा, पंजाब (Punjab), हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि गुजरातसह अनेक राज्यांमध्ये निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. मात्र, अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील आम आदमी पक्षाला दिल्लीनंतर फक्त पंजाबमध्येच विजय मिळाला. आपसाठी पंजाबची निवडणूक अत्यंत महत्त्वाची ठरली. आपनं (Aam Aadmi Party) पंजाबमध्ये एकहाती सत्ता काबीज केली. पंजाबमधील विजयानंतर अरविंद केजरीवाल आणि आम आदमी पक्षानं इतर राज्यांतील निवडणुकांसाठीही कंबर कसली आहे. 


आपचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनी स्वतः हिमाचल आणि गुजरातमध्ये या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या विधानसभा निवडणुकांची जबाबदारी स्वीकारली आहे. ते सतत गुजरात (Gujrat) आणि हिमाचल प्रदेशचे दौरे करत असतात. या दोन्ही राज्यांत भाजपचं सरकार आहे. आपली रणनीती बदलताना अरविंद केजरीवाल यांनी भाजपचा बालेकिल्ला म्हटल्या जाणाऱ्या गुजरातमध्ये आपला पाया मजबूत करण्यास सुरुवात केली आहे. केजरीवाल गुजरातमध्ये सातत्यानं सभा घेत आहेत. 


आपकडून गुजरात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाच्या घोषणा 


केजरीवाल यांनी दिल्ली आणि पंजाबप्रमाणेच गुजरातमध्येही अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. केजरीवाल यांनी 2 लाख रुपयांपर्यंत शेतकरी कर्जमाफी, शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा, 300 युनिटपर्यंत मोफत वीज, 10 लाख सरकारी नोकऱ्यांसह अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत. अरविंद केजरीवाल 12 आणि 13 सप्टेंबरला दोन दिवसीय गुजरात दौऱ्यावर आहेत. 182 सदस्यीय गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी त्यांच्या पक्षानं यापूर्वीच 29 उमेदवारांच्या तीन याद्या जाहीर केल्या आहेत.


नितीश कुमारही मोदींना टक्कर देण्याच्या तयारीत 


दरम्यान, नितीश कुमार भापला धक्का देत लालू प्रसाद यादव यांच्या आरजेडीसोबत हातमिळवणी करत पुन्हा एकदा बिहारच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. बिहारपाठोपाठ आता नितीश कुमार भाजपला देशाच्या सत्तेतून हद्दपार करण्यासाठी प्रयत्न करत असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यासाठी त्यांनी कंबर कसल्याच्याही चर्चा सुरु आहेत. अलिकडेच नितीश कुमार यांनी दिल्ली दौरा करत अनेक महत्त्वाच्या भेटीगाठी घेतल्याचं पाहायला मिळालं. तसेच, भाजपविरोधात विरोधकांची मूठ बांधण्यासाठी ते प्रयत्नशील असल्याचंही बोललं जात आहे. आता आम्ही तिसरी आघाडी नाही तर मुख्य आघाडी करणार असल्याचं नितीश यांचं म्हणणं आहे. 


सध्या राजकीय वर्तुळात विरोधकांकडून नितीश कुमार यांचं नाव पंतप्रधान पदासाठी चर्चेत असल्याच्या चर्चा सुरु आहेत. नितीश कुमारांनी मात्र या चर्चा फेटाळून लावत आपली अशी इच्छा नसल्याचं म्हटलं आहे. परंतु, जेडीयू आणि इतर पक्षांकडून पंतप्रधान पदासाठी नितीश कुमार यांच्याच नावाचा उल्लेख वारंवार केला जात आहे.