नवी दिल्ली: भीषण पाणीटंचाईत अडकलेल्या लातूरकरांच्या मदतीसाठी आता देशभरात अनेक मदतीचे हात येण्यास सुरुवात झाली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी देखील तहानलेल्या लातूरला पाणी देण्याची तयारी दर्शवली आहे. यासाठी त्यांनी पंतप्रधान मोदींना एक पत्र लिहिलं आहे.


 

दिल्लीकर नागरिक दररोज पाणी वाचवून 10 लाख लिटर पाणी लातूरला देण्यास तयार आहेत, फक्त केंद्र सरकारने ते पाणी लातूरपर्यंत पोहचवण्याची व्यवस्था करावी असं या पत्रात म्हटलं आहे.

 

मिरजहून पाणी एक्स्प्रेस लातुरात

 

दरम्यान, दुष्काळानं त्रस्त झालेल्या लातुरकरांसाठी आजची सकाळ ही नव्या सुर्योदयासह एक नवी उमेद घेऊन आली.  कारण, गेले कित्येक दिवस पाण्याची आतुरतेने वाट पाहणाऱ्या लातुरकरांची पाण्याची प्रतीक्षा अखेर आज संपुष्टात आली. पाण्याची मिरज एक्सप्रेस आज सकाळी लातुरात दाखल झाली.

 

पाण्याचे 10 वॅगन्स या एक्सप्रेसला जोडण्यात आले होते. एका वॅगनमधून साधारणपणे 50 हजार लिटर पाणी नेण्यात आलं आहे. त्यामुळे या पहिल्या खेपेला लातूरकरांना तब्बल ५ लाख लीटर पाणी मिळालं. तसेच लवकरच उर्वरित वॅगनही लवकरच लातूरकडे पाठवली जाणार आहेत.

 

दरम्यान, लातूरात भीषण पाणीटंचाई असल्याने सरकार याआधी उजनी धरणातून रेल्वेनं लातूरला पाणी देणार होतं. मात्र त्यातही अडचणी आल्याने मिरजची निवड करण्यात आली. एखाद्या जिल्ह्याला रेल्वेने पाणी देण्याची वेळ महाराष्ट्रावर पहिल्यांदाच ओढावली आहे.