नवी दिल्ली : हिमाचल प्रदेशातील मंडी येथे भूस्खलन होऊन भीषण अपघात झाला आहे. या अपघातात मातीच्या ढिगाऱ्याखाली दोन बस गाडल्या गेल्याने यातील 60 जणांचा मृत्यू झाला आहे.

भूस्खलनामुळे मातीच्या ढिगाऱ्याखाली सापडलेल्या बसपैकी एक बस चंबा येथून मनाली येथे जात होती. तर दुसरी मनाली येथून कटरा येथे जात होती. या बस मंडी येथे आल्या असताना हा अपघात झाला.

हिमाचल प्रदेशमधील मंडी राष्ट्रीय महामार्गावर शनिवारी रात्री भूस्खलन झालं. ज्यामध्ये 2 बस अडकल्या असून, एक बस 800 मीटरपर्यंत वाहून गेली आहे, शिवाय अनेक लोक जमिनीखाली गाडले गेले. या घटनेतील पाच जणांना वाचवण्याच यश आलं असून, त्यांच्यावर जवळच्या रूग्णालयात उपचार सुरू आहेत.



भूस्खलनात अडकलेल्या दोन्ही बस चहा-नाश्त्यासाठी एके हायवेलगत उरला- जोगिंद्रनगरजवळ कोटकरुपीमध्ये थांबल्या होत्या. त्यावेळी ही दुर्घटना घडली.

या घटनेची माहिती मिळताच एनडीआरएफचं पथक घटनास्थळी दाखल झालं असून, बचाव कार्य युद्धपातळीवर सुरु आहे. या घटनेनंतर स्थानिक प्रशासनाने मंडी ते कुल्लूपर्यंतचा महामार्ग वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद केला आहे.

या घटनेनंतर प्रशासनाने हेल्पलाईनही सुरु केल्या आहेत. प्रशासनाने मदत कार्यासाठी 01905-226201,202,203 हे संपर्क क्रमांक उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. तर परिवहन मंडळानेही दोन क्रमांक उपलब्ध करुन दिले आहेत. यात 01905235538 आणि मोबाईल क्रंमाक 9418001051 या नंबरवर संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.