नवी दिल्ली : भारत-चीन यांच्यात अद्यापही सीमेवर तणाव सुरु आहे. यादरम्यान, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) अजित डोवाल यांनी चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांच्यासोबत व्हिडीओ कॉलवर चर्चा केली. दोन्ही राष्ट्रांमध्ये असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर ही चर्चा रविवारी झाली. एएनआय या वृत्तसंस्थेने सुत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही देशांमध्ये झालेल्या या चर्चेत भविष्यातील शक्यतांवरही चर्चा करण्यात आली. यासंदर्भात जवळपास दोन तास चर्चा झाली. या चर्चेमुळेच चीनचं सैन्य बॅकफूटवर गेलं अशी चर्चा होत आहे. कारण या व्हिडीओ कॉलनंतरच चिनी सैन्याने माघार घेतली आहे. डोवाल यांनी वांग यी यांच्यासोबत दोन्ही देशांमध्ये असलेल्या तणावा संदर्भातील अनेक मुद्द्यांवर चर्चा केली.


भारत आणि चीन सीमावादावर मोठी घडामोड आज समोर आली होती. पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्यातून चीनने आपलं सैन्य दीड ते दोन किलोमीटर मागे घेतलं आहे. माहितीनुसार चिनी सैन्यानं 1.5 ते 2 किमी पर्यंत आपले तंबू मागे घेतले आहेत. हे तंबू चीनने पेट्रोलिंग प्वाईंट 14 च्या मागे घेतले आहेत. पेट्रोलिंग प्वाईंट 14 ही तिच जागा आहे जिथं 15-16 जून दरम्यान रात्री भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये हिंसक झटापटीत 20 भारतीय सैनिक शहीद झाले होते.


दरम्यान, डोवाल आणि वांग यी यांच्यात झालेल्या व्हिडीओ कॉलनंतरच चीनने गलवान खोऱ्यातील आपलं सैन्य दीड किलोमीटर मागे घेण्याचा निर्णय घेतला, अशा चर्चा सध्या रंगल्या आहेत. गलवान खोऱ्यात दोन्ही सैनिकांमध्ये झालेल्या हिंसक झडपेनंतर दोन्ही देशांमध्ये जो तणाव निर्माण झाला होता. त्या तणावाच्या पार्श्वभूमीवर डोवाल आणि वांग यी यांच्यात झालेली चर्चा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. चीनने सैन्य मागे घेतल्यानंतर भारतीय सैन्य सध्या वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहे.


पाहा व्हिडीओ : भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार Ajit Doval यांची चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांशी चर्चा



पंतप्रधान मोदींचा अचानक लेह दौरा


भारत-चीन सीमावादाच्या पार्श्वभूमीवर आढावा घेण्यासाठी पंतप्रधान लेह लडाखमध्ये दाखल झाले होते. भारत आणि चीन सीमेवर तणाव सुरु असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठं सरप्राईज दिलं. 3 जुलै रोजी सूर्योदय होण्याआधीच पंतप्रधान नरेंद्र मोदी अचानक लेहमध्ये पोहोचले. भारत-चीन सीमावादाच्या पार्श्वभूमीवर आढावा घेण्यासाठी पंतप्रधान लेह लडाखमध्ये दाखल झाले होते. विशेष म्हणजे मोदींच्या या दौऱ्याची अतिशय गुप्तता पाळण्यात आली होती. मोदींचा हा दौरा चीनला एकप्रकारे संदेशही आहे की, "देश आपल्या सैन्याच्या पाठिशी ठामपणे उभा आहे." पंतप्रधान मोदींसोबत चीफ ऑफ डिफेंस स्टाफ जनरल बिपिन रावत आणि लष्करप्रमुख एम एम नरवणे हे देखील उपस्थित होते.


भारताला डिवचलं तर उत्तर देण्यास सक्षम : पंतप्रधान


भारत-चीन सीमावादाच्या पार्श्वभूमीवर आढावा घेण्यासाठी पंतप्रधान लेह लडाखमध्ये अचानक दाखल झाले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी चीनलाही खडेबोल सुनावले होते. "भारतीय जवानांनी जगाला आपल्या शौर्याचा नमुना दाखवून दिला आहे," असं म्हणत मोदींनी विस्तारवादाचा काळ मागे सरला आहे, आता विकासवादाचा काळ आहे." अशा शब्दात चीनला सुनावलं होतं.  वेगाने बदलत्या काळात विकासवादच गरजेचा आहे. मागील शतकात विस्तारवादानेच मनुष्यजातीचा विनाश केला. एखादा जर विस्तारवादाच्या हट्टाने पेटला तर हा विश्वाच्या शांततेसाठी धोका आहे. इतिहास साक्षीदार आहे की, अशी ताकद कायमच मिटून जाते, असे मोदी म्हणाले होते.

महत्त्वाच्या बातम्या :


गलवान खोऱ्यातून चिनी सैन्य दीड किलोमीटर मागे हटलं


विस्तारवाद संपला, आता विकासवादाचा काळ, लेहमध्ये मोदींनी चीनला सुनावलं!