नवी दिल्ली : देशभरात शेतकरी आंदोलनं अधिक गंभीर वळण घेत असून यादरम्यानच एका घटनेनं पुन्हा एकदा या आंदोलनानं साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. सिंघु बॉर्डर इथं सुरु असणाऱ्या शेतकऱ्यांच्या आंदोलनात सहभागी संत बाबा राम सिंह (sant baba ram singh) यांनी शेतकऱ्यांच्याच समर्थनार्थ स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली.


संत बाबा राम सिंह होते तरी कोण?


संत बाबा राम सिंह यांना ‘सिंगडा वाले बाबा’ या नावानंही ओळखलं जात होतं. त्यांचा डेरा, म्हणजेच संस्थान हे करनाल जिल्ह्यातील निसंगपाशी असणाऱ्या सिंगडा या गावी आहे. संत बाबा राम सिंह ‘सिंगडा वाले’ म्हणूनच त्यांची ओळख होती. जगभरात ते प्रवचनासाठी जात असत. नानकसर संप्रदायाशी ते संलग्न होते.


सध्या सुरु असणारी शेतकरी आंदोलनं आणि शेतकऱ्यांच्या समस्या यांमुळं ते बरेच निराश होते. बाबा राम सिंह यांनी आत्महत्या करण्यापूर्वी एक चिठ्ठीही लिहिल्याचं म्हटलं जात आहे.


सुसाईड नोटमध्ये त्यांनी नेमकं काय लिहिलं?


"स्वत:च्या हक्कांसाठी रस्त्यावर उतरलेल्या शेतकऱ्यांना पाहून मला दु:ख होते. सरकार या शेतकऱ्य़ांना न्याय देत नाही, जे एक प्रकारे पाप आहे आणि अन्याय करणारा पापी आहे. अन्य़ाय सहन करणंही पाप आहे. कोणी शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी तर कोणी अन्यायाविरोधात काहीतरी केलं आहे. शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ अनेकांनी आपले पुरस्कार परत करुन त्यांना पाठींबा दिला... सरकारी अन्यायामध्येच सेवादार आत्मदाह करतात, हा देखील अत्याचाराविरुद्ध उठवलेला आवाज आहे. वाहे गुरु जी का खालसा, वाहे गुरुजी की फतेह.”


या घटनेबाबत पोलीस म्हणतात...


सोनिपत पोलिसांकडून संत बाबा राम सिंह यांच्या आत्महत्येनंतर अधिकृत माहिती देण्यात आली. ज्यामध्ये त्यांच्या आत्महत्येच्या वृत्ताला दुजोरा देत बाबा राम सिंह यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी करनाल येथील कल्पना चावला रुग्णालात नेण्याचं सांगण्यात आलं. सदर प्रकरणाची चौकशी सुरु असल्याचंही पोलिसांनी स्पष्ट केलं.





राहुल यांनी व्य़क्त केलं दु:ख


संत बाबा राम सिंह यांच्या आत्महत्येनंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दु:ख व्यक्त केलं. मोदी सरकारनं क्रूरतेची मर्यादा ओलांडली आहे, या शब्दांत त्यांनी नाराजी व्यक्त केली. शेतकऱ्यांची परिस्थिती पाहून संत बाबा राम सिंह यांनी आत्महत्या केली असं म्हणत गांधी यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. आतापर्य़ंत अनेक शेतकऱ्यांचा या संघर्षात बळी गेला आहे, तेव्हा तातडीनं हा कृषीविरोधी कायदा मागे घ्या आणि हट्ट सोडा असं राहुल गांधी मोदी सरकारला उद्देशून म्हणाले.