...म्हणून समर्थक जयललितांना 'देव' मानतात!
एबीपी माझा वेब टीम | 06 Dec 2016 12:06 PM (IST)
चेन्नई: दिवंगत मुख्यमंत्री जयललिता या संपूर्ण तामिळनाडूत 'अम्मा' या नावानं परिचित होत्या. आपल्या कार्यकाळात त्यांनी अनेक लोकप्रिय निर्णय घेतले. त्यामुळेच त्यांचे समर्थक त्यांची थेट 'देवा'शीच तुलना करायचे. जयललिता यांनी लोकांची गरज ओळखून 'अम्मा कॅन्टिन' ही योजना सुरु केली. ज्यामध्ये अगदी कमी पैशात भरपेट जेवण मिळू शकत होतं. त्यांचा हा निर्णय त्यांना फारच लाभदायक ठरला. लोकप्रिय निर्णयाचं त्यांनी महत्व ओळखलं आणि तशा निर्णयांचा त्यांनी धडाकाच लावला. सुरुवातील 'अम्मा' नावानं ओळखल्या जाणाऱ्या जयललितांनी 'अम्मा' हा ब्रॅण्डच तयार केला. त्यांनी तामिळनाडूत अम्मा मिनरल वॉटर, अम्मा भाजीची दुकानं, अम्मा फार्मसी आणि अम्मा सिमेंट अशा अनेक जीवनाश्यक गोष्टी स्वस्त दरात उपलब्ध करुन दिल्या. त्यामुळे त्यांनी थेट लोकांच्या मनात स्थान मिळवलं. त्यानंतर लोक त्यांची देवाशी तुलना करु लागले. दरम्यान, सुरवातीच्या काळात त्यांच्यावर अनेक भ्रष्टाचाराचे आरोप लागले. पण त्यानंतर आपल्यावर असे आरोप होणार नाही याची त्यांनी पुरेपूर काळजी घेतली. मात्र, काही महिन्यांपूर्वीच एका प्रकरणामुळे त्यांना जेलवारी करावी लागली होती. पण नंतर त्या प्रकरणातून त्यांची निर्दोष सुटका करण्यात आली होती. त्यामुळे त्यांच्या समर्थकांचा आत्मविश्वास चांगलाच दुणावला होता. 68 वर्षीय जयललिता यांचा करिष्मा काय होता हे 2014च्या लोकसभा निवडणुकीच्या निकालावरुन समजून येतं. 2014 लोकसभा निवडणुकीत देशभरात मोदी लाट असतानाही तामिळनाडूत 39 जागांपैकी तब्बल 37 जागी जयललितांच्या पक्षाचे उमेदवार निवडून आले. त्यावरुन त्यांची तामिळनाडूतील लोकप्रियता आपल्याला समजून येते. सलग दुसऱ्यांदा सत्ता स्थापन करणाऱ्या जयललिता या तामिळनाडूतील दुसऱ्याच राजकारणी आहेत. याआधी त्यांचे राजकीय गुरु एमजीआर यांनीच ही किमया केली होती. त्यांनी हॅटट्रिक साधली होती.