श्रीनगर : मुंबई हल्ल्याचा मास्टर माईंड हाफिज सईदने भारतासोबत युद्ध छेडण्याचा इशारा दिला आहे. दोन दिवसांपूर्वी पुलवामामध्ये सैनिकांनी केलेल्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर हाफिज सईदने एक व्हिडीओ जारी केला आहे. ज्यात त्याने लवकरच काश्मीर स्वतंत्र होईल, असा विश्वासही व्यक्त केला आहे.


हाफिज सईदने काश्मीरी जनतेला भडकवण्याच्या हेतूने व्हिडीओ बनवला आहे. या व्हिडीओत हाफिजने मोठ्या प्रमाणात गरळ ओकली आहे. पुलवामामध्ये भारतीय सैन्यांनी दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर स्थानिकांनी दगडफेक केली होती. या दरम्यान सैन्याच्या गोळीबारात सात स्थानिक मारले गेले होते. या हल्ल्याला मुद्दा करत हाफिज काश्मीरच्या नागरिकांना भडकवण्याचा प्रयत्न करत आहे.

पुलवामामध्ये ठार झालेल्या दहशतवाद्यांना उद्देशून हाफिज सईद म्हणाला की, "तुमचं बलिदान व्यर्थ जाणार नाही, तुमच्या बलिदानाची किंमत काश्मीरला स्वतंत्र मिळवूनच घेऊ. आता तो दिवस लांब नाही ज्या दिवशी काश्मीर स्वतंत्र होईल," असा विश्वास हाफिजने व्यक्त केला. भारत पुर्ण जोर लावत आहे, मात्र तुम्ही मागे हटू नका. आपल्याला यश नक्की मिळेल, असही हाफिज म्हणाला. त्यासोबत त्याने आपल्या व्हिडीओमध्ये भारतासोबत युद्ध छेडण्याचा इशाराही दिला आहे.