कल्याण : कल्याणमध्ये नेवाळी विमानतळासाठी जमीन अधिग्रहणाविरोधात पेटलेल्या शेतकरी आंदोलनाची आता संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांना दखल घेतली आहे. दिल्लीत उद्या या संदर्भातील संबंधित विभागाची त्यांनी बैठक बोलावली आहे. शिवाय या प्रकरणाची सर्व माहिती त्यांनी मागवली आहे.


सुभाष भामरे सध्या धुळ्यात आहेत, ते उद्या दिल्लीत जाणार आहेत.

शेतकऱ्यांचं उग्र आंदोलन
नेवाळी विमानतळासाठी सरकारने जबरदस्तीने जमिनी संपादित केल्याच्या विरोधात नाका परिसरकार शेतकऱ्यांचं उग्र आंदोलन सुरु आहे. आक्रमक झालेल्या आंदोलकांनी डोंबिवली-बदलापूर पाईपलाईन रोडवर डावलपाडा गावाजवळ पोलिसांच्या सहा गाड्या पेटवल्या. तर आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केली होती. यामध्ये एसीपी सुनील पाटील यांच्यासह काही पोलिस जखमी झाले आहे. परिस्थिती नियंत्रणासाठी पोलिसांची अतिरिक्त कुमक मागवण्यात आली आहे.

नेवाळीतल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी पॅलेट गनचा वापर केला. यामध्ये 12 आंदोलक जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

दुसऱ्या महायुद्धात ब्रिटीशांच्या लष्कराने नेवाळे गावाजवळ धावपट्टीसाठी जागा घेतली होती. मात्र त्यानंतर ती जागा शेतकऱ्यांच्या ताब्यात गेली. आता पुन्हा नौदलाने जागेवर दावा सांगत कम्पाऊंड टाकल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. जवळपास 7 ते 8 गावातील शेतकऱ्यांच्या जमीन यामुळे बाधित होणार आहे.

संबंधित बातमी

कल्याणमध्ये शेतकऱ्यांचं उग्र आंदोलन, पोलिसांच्या गाड्या पेटवल्या