तमिळानाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांचे आज प्रदीर्घ आजाराने निधन झाले. त्यांचा एक फिल्म स्टार ते पॉलिटिकल क्वीनपर्यंतचा जीवनप्रवास सर्वांना थक्क करणारा होता. ज्येष्ठ तामिळ पत्रकार आर. रामगोपाल यांनी त्यांचा संपूर्ण प्रवास अगदी जवळून पाहिला आहे. त्यांच्या जीवनातील आठवणींवर प्रकाश टाकण्यासाठी त्यांच्याशी साधलेला संवाद


जयललिता यांच्या फिल्म स्टारपासून ते राजकारणातील प्रवेशापर्यंतच्या प्रवासाकडे तुम्ही कसे पाहता?

जयललितांचे संपूर्ण जीवन जवळून पाहण्याचं भाग्य मला लाभलं. 1984 मध्ये त्या जेव्हा राज्यसभेवर तमिळनाडूतून निवडून आल्या, यानंतर त्यांचा राजकारणातील आलेख सदैव चढताच राहिला. राजकारणाच्या प्रत्येक कसोटीवर त्या यशस्वी ठरण्यामागे त्यांची सिनेक्षेत्रातील लोकप्रियताही तितकीच कारणीभूत होती. त्यांची सिनेजगतातील लोकप्रियताच राजकीय क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी व्होटबँक झाली, असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही. पण असं असलं तरी 1984 ते 1990 हा काळ त्यांच्यासाठी अतिशय संघर्षमय होता.



सिनेजगतापासून ते राजकीय जगतामध्ये त्यांचे परिवर्तन कसं झालं?

याचं सर्व श्रेय एमजीआर म्हणजे एमजी रामचंद्रन यांना जाते. कारण एमजीआर यांनीच त्यांना सिनेमा जगतातून राजकारणात आणलं. एमजीआर यांनीच त्यांना 1984 साली राज्यसभेत पाठवलं. जयललिता यांना त्यांनी सर्वसामान्यांची मंत्री, नेता बनवलं. त्या आमदार नसतानाही एमजीआर यांच्यामुळे मंत्रिमंडळाच्या बैठकींमध्ये उपस्थीत राहू शकत होत्या. वेगवेगळ्या अधिकाऱ्यांच्या भेटी घेऊन विविध मुद्द्यांवर चर्चा करु शकत होत्या. निवडणुकीच्या प्रचारात गावागावात जाऊन पोहचल्या. त्यामुळे त्यांच्या लोकप्रियतेत आणखीच भर पडली.त्यांच्या सिनेमा जगतातील 100 टक्के लोकप्रियतेपैकी 80 टक्के लोकप्रियतेचं रुपांतर व्होटबँकमध्ये झालं. विशेष म्हणजे, ही लोकप्रियता त्यांनी 30 वर्षापर्यंत अबाधित राखली.

तमिळनाडूचे गेल्या 50 वर्षातील राजकारण पाहिले तर सातत्याने एमजीआर आणि जयललिता हे एक समीकरण तयार झाले होते. अन या समीकरणाचा जनमानसावर इतका खोलवर परिणाम झाला की, आजही तमिळनाडूतील तरुण वर्गात एमजी आर यांची लोकप्रियता कायम आहे.

सार्वजनिक जीवनात त्यांनी स्वत:ला अनेक मर्यादा घालून घेतल्या होत्या. त्यांनी सिनेजगात वावरताना दारुला हात लावला नाही, किंवा सिगारेटला हात लावला नाही. त्यामुळे जशी इमेज एमजी आर प्रती जनसामान्यांमध्ये होती. तशीच इमेज जयललितांबद्दल तयार झाली होती. अन् एमजी आर यांची व्होटबँक जयललिता यांनी सहज कॅच केली.

एमजी आर यांच्या निधनानंतर त्यांचा राजकीय वारसदार कोण हा प्रश्न निर्माण झाला, त्यावेळी जयललिता यांनी कशी आघाडी मिळवली?

वास्तविक, एमजी आर यांची व्होटबँकच जयललिता यांना त्यांचा वारसदार म्हणून घोषित करण्यास कारणीभूत ठरली. कारण, एमजीआर यांच्या पत्नी जानकी रामचंद्रन यांची जयललिता यांच्याप्रमाणे लोकप्रिय नव्हत्या. 100 टक्क्यामधील 30 टक्केही त्यांची लोकप्रियता होती. विशेष म्हणजे, एमजीआर यांनीही हे जाणूनबुजून केलं होतं. एमजीआर हे पत्रकारांना मुलाखत देताना जानकी रामचंद्रन या माझ्या पत्नी असल्याचे ठासून सांगत. राजकीय वारसदार नाहीत असं ते सांगत. त्यामुळे एमजी आर यांनीच एकप्रकारे जयललिता या राजकीय वारसदार असल्याचे घोषित केले होते.



1992 मध्ये जयललिता जेव्हा पहिल्यांदा मुख्यमंत्री झाल्या, त्यावेळी नाट्यमय घडामोडी घडल्या, त्या काय घटना होत्या?

जयललिता यांची लोकप्रियता कमी करण्यासाठी डीएमकेचे करुणानिधी यांनी त्यांच्याविरोधात आघाडी उघडली. ते सार्वजनिक व्यासपीठांवरुन जयललितांवर टीकेची झोड उठवत. विधानसभा किंवा राजकीय सभा सर्वच ठिकाणी जयललिता यांची लोकप्रियता कमी करण्यासाठी त्यांच्यावर बेच्छूट आरोप करत. अन् असे केले तरच आपली सत्ता आबाधित राहिल, असं त्यांना वाटत असे. पण जयललिता यांनीच त्याला आपले राजकीय अस्त्र बनवले. द्रौपदीच्या वस्त्रहरणाचा राजकीय सभांमध्ये उल्लेख करुन जयललिता यांनी गावागावात  प्रचार सुरु केला. यातून जनमानसात जयललितांबद्दल सहानुभूती निर्माण झाली. त्यामुळे एमजीआर यांची वारसदार आणि करुणानिधीचे आरोप असे घटक एकत्रित आल्याने जयललिता राजकीय पटलावर यशस्वी झाल्या.

त्यांनी मुख्यमंत्री झाल्यावर सुरु केलेले आम्मा इडलीमध्ये 2 रुपयांना 2 इडली, आम्मा रोटीमध्ये 2 रुपयांना तीन रोटी अशा गरिबांसाठीच्या योजना सुरु केल्या. त्या पत्रकारांशीही जेव्हा चर्चा करत, तेव्हा 'मी गरीबाच्या ताटाकडे लक्ष देते ना की श्रीमंताच्या' असं आवर्जून सांगत. त्यांचं 250 रुपयात जे मॅनेजमेंट होतं हेही कमालीचं होतं. यासाठी त्या केंद्र सरकारच्या सबसिडीचा योग्य पद्धतीने वापर करत. त्यामुळे गेल्या तीन-चार वर्षात आम्मा कॅन्टिन लोकप्रिय होण्यामागे हे एक कारण असेल.

2014 च्या निवडणुकीत मोदी लाट असतानाही जयललिता यांनी कसं काय यश मिळवलं?

ज्याप्रमाणे, सिनेमात गरिबांना कैवारी हिरो असतो. तसंच त्यांनी राजकीय जीवनातही स्वत:ला बनवलं. त्यांच्यात जनमताला साचेबद्ध करण्याची त्यांच्याकडे विलक्षण क्षमता होती. त्यातूनच त्यांनी जनमानसावर स्वत:ची छाप पाडली, आणि या निवडणुकीतही यश संपादन केलं.



जयललिता आणि करुणानिधी संघर्षाबद्दल काय सांगाल?

जयललिता पहिल्यांदा मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांच्यात शत्रूत्व निर्माण झालं. कारण करुणानिधींनी सार्वजनिक जीवनात जयललितांवर ज्या पद्धतीने चिखलफेक केली, त्यातून जयललितांच्या मनात त्वेषाची भावना निर्माण झाली. त्यामुळे तमिळनाडूच्या राजकारणावर या वैयक्तीक शत्रूत्वाचा प्रदीर्घ परिणाम झाला. तुम्ही जर करुणानिधींबद्दल चार अपशब्द वापरले, तर तुम्ही जयललितांच्या मंत्रिमंडळात मंत्री बनू शकता. शिवाय तुमच्यावर जर विरोधकांकडून चिखलफेक केली, तर ते तुमचे भूषण समजले जाते. करुणानिधीही हेच सातत्याने करत.

जयललितांच्या राजकीय जीवनात अनेक वाद निर्माण झाले, त्यातीलच एक बेहिशेबी मालमत्ता प्रकरण त्याबद्दल काय सांगाल?

वास्तविक जयललितांना अहमपणा होता. सार्वजनिक सभांमध्येही व्यासपीठावर एकच खुर्ची असे, त्यांच्या जवळपास कोणीही नसे. चेन्नईहून देखील नवी दिल्लीला प्रवास करताना स्पेशल विमानाने जात. त्यांचा तो विचित्र स्वभाव होता. जनसामान्यात त्यांची प्रतिमा एखाद्या राणीप्रमाणे होती. ती त्यांना वेगळी करावी असं कधीही वाटलं नाही. त्यामुळे त्यांची ती जीवनपद्धती होती. त्यांच्या घरातही 300-400 जोड चप्पल, साडी असं सर्व असे. त्याचा दृष्टीकोन एखाद्या गर्भश्रीमंताप्रमाणे होता. श्रीमंतीचा डंगोरा पिटणे त्यांना आवडत असे.



त्याच्या मानस पुत्राच्या लग्नाबद्दल काय सांगाल?

त्यांच्या आई-वडिलांचे खुप कमी वयात निधन झाले. त्यांना भाऊ, बहीण, मुलगा, मुलगी कोणीच नाही. त्यामुळे त्यांनी एकच मुलगा दत्तक पुत्र घेतला. त्याचं लग्न 100 कोटीमध्ये धुमधडाक्यात लाऊन द्यायचं अशी शपथ त्यांनी घेतली होती. आणि त्यांनी ते करुन दाखवलं.

राजकीय क्षेत्रात यशाच्या शिखरावर असतानात प्रकृतीने त्यांना साथ दिली नाही याबद्दल काय सांगाल?

त्यांच्या या यशाचे श्रेय त्यांच्या चार-पाच भाषांवरील प्रभूत्व आहे. त्या तमिळनाडूत तामिळ बोलायच्या. केरळमध्ये मल्ल्याळम जनतेशी संवाद साधायच्या, कर्नाटकमध्ये कन्नडमध्ये. आंध्रमध्ये तेलगू, अशा अनेक भाषा आवगत असल्याने त्या राष्ट्रीय राजकारणात जम बसवू शकल्या. त्यांना पंतप्रधान बनण्याची महत्त्वकांक्षा होती. पण प्रकृती अस्वस्थाने ते शक्य झाले नाही. शिवाय काँग्रेस आणि करुणानिधींनी टार्गेट करुन त्यांचं राजकीय जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. पण तसे शक्य झाले नाही. संघर्ष करुन त्या पुढे आल्या.

राष्ट्रीय राजकारणात त्या माजी पंतप्रधान वाजपेयींचा प्रचंड आदर करत. एनडीएमध्ये सहभागी होण्यामागेही वाजपेयींसारखे व्यक्तीमत्त्व होते. त्यामुळे आजही मोदी सरकारमध्ये सुमित्रा महाजन यांच्याबरोबर लोकसभेचे उपसभापती असलेले तंबीदुरई हे जयललिता यांच्याच एआयएडीएमकेचे आहेत.

दुसरं सांगायचं तर, जयललितांची इमेज नरेंद्र मोदींशी मिळती-जुळती आहे. जयललिता नरेंद्र मोदींच्या शपथग्रहण सोहळ्याला उपस्थीत होत्या. तर नरेंद्र मोदी जयललितांच्या शपथविधी कार्यक्रमाला उपस्थीत होते. खरं सांगायचं तर एआयएडीएमके हा पक्ष हिंदुत्ववादी विचारांना मानणारा पक्ष आहे. एआयएडीएमकेच्या जाहीरनाम्यातही राममंदिर बांधण्याला समर्थन करण्याचे नमुद केले आहे. त्यामुळे राष्ट्रीय चित्र पाहिले तर, 2014 वेळी जेव्हा त्यांना विचारण्यात आलं, पण प्रकृती कराणास्तव राष्ट्रीय राजकारणात जात नसल्याचे त्यांनी सांगितलं. नरेंद्र मोदी तिथे असल्याने आम्हाला चिंता नाही. त्यामुळे त्यांना सपोर्ट केल्याचं त्या सांगायच्या.

व्हिडीओ पाहा