पणजी : गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये सहा महिला नौदल अधिकाऱ्यांसह जगभ्रमंतीला निघालेली ‘आयएनएसव्ही तारिणी’ ही शिडाची बोट गोव्यात परतली आहे. संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी सहा समुद्रकन्यांचं स्वागत केलं.


महिला अधिकाऱ्यांच्या या चमूमध्ये लेफ्टनंट कमांडर वर्तिका जोशी, लेफ्टनंट कमांडर प्रतिभा जामवाल, लेफ्टनंट कमांडर पद्रपल्ली स्वाती, लेफ्टनंट ऐश्वर्या बोध्दापती, लेफ्टनंट शोरगप्पन विजया, लेफ्टनंट पायल गुप्ता यांचा समावेश होता.

आशियाई महिलांनी समुद्री मार्गाने पृथ्वी परिक्रमा करण्याची ही पहिलीच वेळ होती. यासाठी गेल्या दोन वर्षांपासून सहा जणींनी तयारी केली होती.


दक्षिण आफ्रिकेतील केप टाऊन हे या भ्रमंतीतील अखेरचं बंदर होतं. त्यानंतर मार्चमध्ये ही बोट परतीच्या प्रवासाला निघाली. या प्रवासात महिला नौदल अधिकाऱ्यांनी 21 हजार 600 सागरी मैल अंतर पार केलं.

जगभ्रमंती करताना अनेकवेळा त्यांच्या शिडाला वाईट हवामानाला तोंड द्यावं लागलं. सात मीटर उंची पर्यंतच्या लाटा आणि ताशी 60 किलोमीटर वाऱ्याच्या प्रचंड वेगाचाही सामना करावा लागला.


ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, फॉकलंड आणि दक्षिण आफ्रिकेत मिळून चार बंदरांवर या बोटीने थांबे घेतले. ही बोट 55 फूट लांबीची असून गोव्यातच अॅक्वारिस शिपयार्डमध्ये बांधण्यात आली होती. समुद्रातील जैव विविधता, पर्यावरण याचा या अधिकाऱ्यांनी अनुभव घेतला.