Indigenous Aircraft Carrier INS Vikrant : भारतीय नौदलाची (Indian Navy) ताकद आणखी वाढणार आहे. आज देशाची पहिली स्वदेशी विमानवाहू युद्धनौका (India Made Aircraft Carrier) आयएनएस विक्रांत (INS Vikrant) भारतीय नौदलाच्या लढाऊ ताफ्यात सामील होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते केरळमधील कोची येथे उद्घाटन पार पडल्यानंतर भारतीय नौदलाच्या ताफ्यात आयएनएस विक्रांत सामील होईल. 


पहिली स्वदेशी विमानवाहू युद्धनौका 'INS Vikrant"


पहिली स्वदेशी विमानवाहू युद्धनौका INS विक्रांत संरक्षण क्षेत्रातील स्वावलंबनाच्या दिशेने एक महत्त्वाचं पाऊल मानलं जात आहे. या युद्धनौकेची रचना स्वदेशी आहे. भारतीय नौदलाच्या स्वतःच्या संस्थेच्या वॉरशिप डिझाइन ब्युरोने युद्धनौका डिझाइन केली आहे. तर बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या कोचीन शिपयार्ड लिमिटेड या सार्वजनिक क्षेत्रातील शिपयार्ड कंपनीनं ही युद्धनौका तयार केली आहे.


विक्रांतवर 30 विमाने तैनात करण्यात येणार


आयएनएस विक्रांतवर 30 विमाने तैनात असतील. त्यापैकी 20 लढाऊ विमाने आणि 10 हेलिकॉप्टर असतील. सध्या विक्रांतवर मिग-29 के लढाऊ विमाने तैनात केली जातील, अशी माहिती व्हाईस अॅडमिरल घोरमाडे यांनी दिली आहे. त्यानंतर टीईडीबीएफ म्हणजेच दोन इंजिन डेकवर आधारित फायटर जेट डीआरडीओ आणि एचएएलद्वारे तैनात केले जातील. कारण TEDBF पूर्णपणे तयार होण्यासाठी काही वर्षे लागू शकतात, यादरम्यान अमेरिकेची F-18A सुपर हॉर्नेट किंवा फ्रान्सची राफेल (M) तैनात केली जाऊ शकते. या दोन्ही लढाऊ विमानांच्या चाचण्या सुरू झाल्या असून अंतिम अहवालानंतर कोणती लढाऊ विमाने तैनात करायची, याचा निर्णय घेतला जाणार आहे. घोरमाडे म्हणाले की, यावर्षी नोव्हेंबर महिन्यापासून विक्रांतवर मिग-29 लढाऊ विमाने तैनात करण्यास सुरुवात होईल.


भारतासाठी ऐतिहासिक दिवस


व्हाईस अॅडमिरल एसएन घोरमाडे म्हणाले की, 2 सप्टेंबर हा ऐतिहासिक दिवस आहे. 40 हजार टन विमानवाहू युद्धनौका तयार करण्याची क्षमता असलेल्या जगातील सहा निवडक देशांच्या पंक्तीत भारत सामील झाला आहे. उर्वरित पाच देश अमेरिका, रशिया, चीन, फ्रान्स आणि इंग्लंड आहेत. व्हाईस अॅडमिरलच्या मते, आयएनएस विक्रांतचा भारताच्या युद्ध ताफ्यात समावेश केल्याने इंडो-पॅसिफिक क्षेत्रात शांतता आणि स्थिरता राखण्यास मदत होईल.


दरम्यान, कोणत्याही विमानवाहू युद्धनौकेची ताकद म्हणजे त्यावर तैनात केलेली लढाऊ विमानं आणि हेलिकॉप्टर असतात. विमानवाहू जहाज समुद्रावर तरंगणारे हवाई क्षेत्र म्हणून काम करते. त्यावर तैनात केलेली लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर कित्येक शंभर मैल दूर समुद्राचे निरीक्षण आणि संरक्षण करतात. आयएनएस विक्रांतचा टॉप स्पीड 28 नॉट्स आहे आणि ही युद्धनौका एका वेळी 7500 नॉटिकल मैल अंतर कापू शकतो. म्हणजेच एका वेळी भारत सोडल्यानंतर तो ब्राझीलमध्ये पोहोचू शकतो. त्यावर तैनात केलेली लढाऊ विमाने एक ते दोन हजार मैलांचे अंतरही पार करू शकतात.