Operation Sindoor : पहलगाम हल्ल्यानंतर (Pahalgam Attack) भारताने केलेल्या प्रत्युत्तराच्या कारवाईत पाकिस्तानचे 100 हून अधिक दहशतवादी ठार झाले असून त्यामध्ये कंदहार विमान अपघात आणि पुलवामा हल्ल्यातील मास्टरमाईंड युसूफ अझहरचा खात्मा केल्याची माहिती भारतीय लष्कराने दिली. भारताने केलेल्या कारवाई पाकिस्तानचे 35 ते 40 सैनिक ठार झाले असून त्यामध्ये काही अधिकाऱ्यांचाही समावेश आहे अशीही माहिती लष्कराने दिली. 

भारताने पाकिस्तानमध्ये हवाई हल्ले करून पहलगाम दहशतवादी हल्ला आणि देशातील इतर हल्ल्यांचा बदला घेतला. भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor) अंतर्गत ही कारवाई केली. रविवारी (11 मे 2025) पत्रकार परिषदेत DGMO लेफ्टनंट जनरल राजीव घई यांनी या कारवाईबद्दल अनेक तपशील दिले.

युसूफ अझहर मारला गेला

लेफ्टनंट जनरल राजीव घई म्हणाले की, "पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये केलेल्या हवाई हल्ल्यात 9 दहशतवादी अड्ड्यांवर झालेल्या हल्ल्यात 100 हून अधिक दहशतवादी मारले गेले. त्यात युसूफ अझहर (Yusuf Azhar), अब्दुल मलिक रौफ आणि मुदासिर अहमद सारखे मोठे दहशतवादी होते. हे दहशतवादी आयसी-814 विमानाचे अपहरण आणि पुलवामा बॉम्बस्फोटातही सहभागी होते. लष्कर-ए-तोयबाचे केंद्र असलेल्या आणि अजमल कसाब आणि डेव्हिड हेडलीसारखे दहशतवादी निर्माण करणाऱ्या मुरिदके या ठिकाणाला उद्ध्वस्त केलं."

लेफ्टनंट जनरल राजीव घई म्हणाले की, "युसूफ अझहर हा IC-814 विमान अपहरणाचा मास्टरमाइंड होता, जो जैश-ए-मोहम्मदशी संबंधित होता. त्याच वेळी अब्दुल मलिक रौफ आयसी-814 अपहरणात तसेच पुलवामा हल्ल्याच्या कटात सहभागी होता. हवाई हल्ल्याचा उद्देश दहशतवादी हल्ल्यांच्या कट रचणाऱ्यांना शिक्षा करणे आणि त्यांच्या दहशतवादी पायाभूत सुविधा नष्ट करणे हा होता, जो आम्ही यशस्वीरित्या साध्य केला."

Masood Azhar : मसूद अझहरची सुटका करावी लागली होती

मोहम्मद युसूफ अझहर याला उस्तादजी आणि घोसी साहब म्हणूनही ओळखले जात होते. अझहर हा जैश-ए-मोहम्मदचा मुख्य कमांडर होता आणि तो मौलाना मसूद अझहरचा मेहुणा होता. त्याच्याकडे जैश-ए-मोहम्मदसाठी शस्त्रास्त्र प्रशिक्षणाची जबाबदारी होती. युसूफचा आयसी-814 विमान कंधहार अपहरण प्रकरणातही सहभाग होता. त्यामुळे भारताला 1999 मध्ये मसूद अझहरची सुटका करावी लागली होती.

कंदहार विमान अपहरण प्रकरण 1999 साली घडलं होतं. काठमांडू ते दिल्ली असे प्रवास करणारे आणि 170 प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या विमानाचे पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी अपहरण केलं. दहशतवाद्यांनी ते विमान अफगाणिस्तानमधील कंदहार या ठिकाणी घेऊन गेले. या विमान प्रवाशांची सुटका करण्यासाठी भारताला तीन दहशतवाद्यांना सोडून द्यावं लागलं होतं.